शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

सेवा

अवर्णनीय ! सुंदर !! फारच सुंदर !!! फारच छान !!!!

ही जी कांही कर्तव्यें आपल्या गुरुबंधू-भगिनींकडून पार पाडली जाताहेत, ती खरोखरीच वाखाणण्याजोगीच आहेत यात तीळमात्र देखील शंका असू नये. 

यात प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे आपल्या सद्गुरूंमाऊलींप्रती असणारी आपली आस्था, आपली कळकळ, आपले प्रेम, आपले ऋणानुबंध, आपली कर्तव्यनिष्ठा, आपली तळमळ. यामुळे येथे कोणालाही कुठल्याही कामाचा बोजा न वाटता, तो आनंदाने ही कर्तव्यें पार पाडण्यासाठी सदैव तयार व तत्पर देखील असतो, त्याशिवाय तो प्रत्येक कर्तव्यात न चुकता हजर देखील असतो व राहण्याचा प्रयत्न देखील करीत असतो. यदाकदाचित काही कारणाने म्हणा अथवा त्याच्या कार्यबाहुल्यामुळे त्याला जर अशावेळेस हजर राहता नाही आले, तर मात्र तो मनापासून हिरमुसला होतो, आपली आपल्या सद्गुरूंप्रती कार्य करण्याची एक संधी हुकली म्हणून तो प्रसंगी दु:खी देखील होत असतो. 

तरी या सर्वस्वांच्या या तळमळीबद्दल, कळकळीबद्दल किती लिहावं तेवढे कमीच होय. 

हो ! हे जरी खरे असले तरी ही एक गोष्ट नाकारता येणार नाही ती की ही संधी आपणां सर्वस्वांना आपली सद्गुरू माऊलीच वेळोवेळी उत्पन्न करून देत असते व त्यामुळेच हे कठीण कार्य आपण बिनदिक्कतपणे पार पाडू शकत असतो, अन्यथा हे शक्य नसते आणि आपणाकडून झाले ही नसते. म्हणूनच आपण सर्वस्व त्या आपल्या सद्गुरू माऊलींचे सदैव ऋणी आहोत.

जय श्री सद्गुरू माउली !
तू आम्हां भक्तांची सावली !!
करी दया आम्हांवरी इतुकी !
की सेवा करूनी घेसी तितुकी !! 
.......ती आम्हा पेलवे जितुकी !!!

आम्ही काय तुझी सेवा करणार ?
ती संधी तुच आम्हांला देणार !!
तुझीया मनी जेव्हां ते येणार,
तेव्हांच ती, तु आम्हां कडून करुन घेणार !!

त्यासाठीच आम्ही तळमळणार,
ती मिळविण्यासच आम्ही धावणार,
ती मिळताच आम्ही तृप्त होणार
शेवटी अपुल्या चरणी स्थीरावणार !!

अनगड म्हणे, 
*बा ! सद्गुरू राया*
*झिजवू आम्ही अमुची काया*
*स्थिरावेल अमुची माया*
*तुझीया सत्ते*!!!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

नावात काय आहे?

अनगड आणि आनंद. या दोहोंचा संधी होताच "अडगडानंद" होतो. तसाच संगम भक्त आणि भगवंताचा, भगवंताच्या नामानेच होतो. भक्त जेव्हा "नामस्मरणात दंग होऊन जातो, एकलय होऊन जातो", त्याचवेळेस भगवान त्या भक्ताला आपल्या जवळ घेतात आणि आपले दर्शन देतात आणि म्हणतात, "बाळा, बघ ! मी कसा ह्या त्रिभूवनात भरून राहिलो आहे ! बघ, मी ह्या त्रिभूवनात भरून राहिलेला असून देखील अलिप्त सुद्धा आहे."

अवघा आनंदीआनंद जहाला की अनगड काय किंवा अनगडानंद काय? एकूण सगळे सारखेच की. सारेची त्या माऊली पुढे नतमस्तकच असतात. 

अनंताचा तो "आ" आणि नंदाचाही "आ" च. म्हणजेच अनंत येणे "निराकार" आणि नंद म्हणजे "आकार", येणे नाम सगुण आणि निर्गुण. ज्यावेळेस "निराकार" "आकार" घेतात, त्याचवेळेस ते मानवी त-हेने अपुल्या चर्मचक्षूंना दिसून येत असतात. अन्यथा आपण त्यांना फक्त "नामस्मरणाच्या" गतीने गेल्यासच समाधी अंगाने पाहू शकू.

ज्या ज्या वेळी भूतलावर भगवंताची आवश्यकता असते, त्या त्या वेळी "निर्गुण" हे अवतारकार्य धारण करून म्हणजेच अवतार घेऊन पृथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात. याचाच अर्थ असा की "निर्गुण" "सगुण" रुपाने अवतरीत होऊन मानवी त-हेने अपुला कार्यभार सांभाळीत असतात, परंतु आपली जाण मात्र कुणालाच देत नाहीत.

ह्या दोघांचाही जेव्हा कृपाशीर्वाद मिळतो, तोची आनंदाने प्रगट होतो, तेथे मग द्वैत भावना न राहता अवघा आनंदीआनंद भाव तेवढा उरतो. 

शेवटी मानवी त-हेने कोणीतरी म्हटलेले आहेच की नावांत काय आहे? नांव महत्त्वाचे नसून, एखाद्याचे काम अर्थात कार्य महत्त्वाचे असते. कर्तव्य महत्त्वाचे असते.

संतांनी तर त्याहीपुढे जाऊन सांगितले आहे की "ते नाम सोपे रे"....... म्हणून मानवी नावाला महत्त्व न देता आपण अज्ञ बालकांनी आपल्या सद्गुरू नामावर भर देऊन, त्यांचे नामस्मरण करने हितकारक ठरावे.

अनगडाला आनंद झाला, म्हणूनी तोची अनगडानंद जहाला. बाकी मानवी त-हेने बघितले तर नावांत काय आहे? 

याउलट अध्यात्म्याच्या दृष्टीने पाहता, नामातच सगळे भरलेले असून, आपल्या भगवंताच्या चरणांप्रत पोहचण्यासाठी नामस्मरण करने अत्यंत आवश्यक आणि गरजेचे देखील आहे.

अनगड म्हणे,  
         "हे देवा, काय करू मी तूझीच सेवा
                   नित्य निरंतर मजला अपुल्या जवळ ठेवा
          "अपुला कधी विसर न होऊ द्यावा
                    हीच विनवणी करीतो मी देवा 
                    (आपुलिया चरणी) !!!

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

*वेदा पडीले मौन शास्त्रे वेडावली |*
*वाचाही निमाली ते श्रीगुरु ||*

         एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंवर हा अभंग रचलेला आहे. एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी हे होते. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना अनुग्रहीत केले होते. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचे सर्वस्व महत्व जाणले होते. त्यांची महती एकनाथ महाराजांनी गाताना, त्या महतीमध्ये त्यांनी सांगितले आहे, 

*वेदा पडीले मौन, शास्त्रे वेडावली*
*वाचाही निमाली, ते श्रीगुरु*

एकनाथ महाराज म्हणतात, "त्या माझ्या सद्गुरूंची महती काय वर्णावी? त्यांची महती गाता गाता *वेद देखील मौनावले, अन् वाचा देखील निमाली. अर्थात वाचा देखील बंद पडली. इतकेच नव्हे, तर जी कांही शास्त्रें आहेत, ती सुद्धा, त्यांची महती गाता गाता, गुणगान गाता गाता वेडावली*, असे ते माझे सद्गुरू आहेत. अशा जाणीवेने जेव्हा एखादा भक्त आपल्या सद्गुरूंचे नामस्मरण करतो, त्यावेळेसच ते सद्गुरु प्रगट होतात, असे आपले बाबा आपल्याला सांगताहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *वेद म्हणजे ध्वनी, येणे नाम!* ते देखिल लहरीत लयबद्ध होऊन जातात. मन देखील लहरीत लयबद्ध होऊन जाते. अशावेळेस तेथे शास्त्र तरी काय करणार?* 

शास्त्र या ठिकाणी टिकूच शकत नाही. *अखंड नाम देखील त्याठिकाणी लय होऊन जाते.* तेथे काहीच शिल्लक रहात नाही. शास्त्रांना त्या सद्गुरूंचा अंतच लागणार नाही आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगतात, *हे सर्वस्व जाणण्याचा पलीकडे आहे. म्हणजेच जाणीवेच्या पलिकडचे आहे.*

ज्यावेळेस आपण आपल्या सद्गुरू माऊलींचे नामस्मरण करता करता आपले देहभान विसरू व त्यांच्यांच नामात तल्लिन होऊ, त्यांच्या स्मरणात रममाण होऊ, त्यांची छबी आपल्या मनात पाहू, त्याचवेळेस आपण ख-या अर्थाने त्यांच्याशी एकरुप होऊन, बाबा म्हणतात त्याप्रमाणे, जाणीवेच्या पलीकडे जाऊन त्या सताशी तादाम्य होऊ शकू. अशी स्थिती झाली असता, काय उरते? तर फक्त पंचमहाभूतांचा देह. *अशा व्यक्तीला ना कशाची जाण असते, ना कशाचे भान असते.* ही एक समाधी स्थिती असते. त्या आनंद ब्रह्मांत ती ज्योत लय झालेली असते.

ऋग्वेदात स्पष्ट म्हटले आहे की *सताचा कोणी अंत लाऊ शकत नाही.* मग तिथे शास्त्रांचा काय पाड लागणारआहे?

बाबा आपणांस समजावून सांगताना म्हणतात, "शास्त्रे वेडावली म्हणजे शास्त्रांना पुढे जाता आले नाही. त्यांना संताचा अंत घेता आला नाही."

श्री सद्गुरू माऊली पुढे *गुह्य उघड करतांना* म्हणते, *अखंड नामाच्या (सतपदाच्या आसनावरून साक्षात सताने दिलेले नाम - फक्त तेच गुरू गुह्य आहे, इतर सताच्या ठिकाणी काहीही गुह्य नव्हते आणि नाही) गतीत गुंग होऊन गेल्यानंतर, जो बाहेर पडणारा प्रणव आहे, बोल आहे तो म्हणजे ॐकार ध्वनी होय.* 

अशाप्रकारे नामस्मरण करत करत जेव्हा भक्त किंवा सेवेकरी जाणीवेच्या, नेणीवेच्या पलीकडे जातो, त्यावेळेस बाबा म्हणतात, नामाची स्थिती बंद होत जाते. त्या भक्ताची स्थिती कशी होते? तर जाणीव रहित स्थिती होते. जाणीव अजिबात रहात नाही. आणि मग अशावेळेस स्वयंम् गुरुतत्व प्रगट होते, अर्थात जो भक्त ज्या सद्गुरूंचे ध्यान करणार तेच सद्गुरु त्याच स्वरुपात प्रगट होतात. अर्थात त्या भक्ताला आपल्या सद्गुरूंचे दर्शन होते. ह्या स्थितीला भक्तीमध्ये मुक्ती आणि मोक्ष म्हटलेले आहे. मुक्ती आणि मोक्ष इतर दुसरा तिसरा नसून, हाच मुक्ती आणि मोक्ष होय.
प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(1) क्रमश:

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश

  *प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
                      *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)

बाबा म्हणतात, "काही ज्योती त्याला प्रकाश हवा म्हणून, ते सताचे ध्यान करीत नाहीत, तर त्याला जीवाची भिती वाटते म्हणून ध्यान करतात." 

बाबा असे कां बरे म्हणत असतील?
आता आपण प्रकाश येणे कोणती स्थिती आणि ध्यान येणे कोणती स्थिती? ह्याबद्दल समजून घेऊ. बाबांना अभिप्रेत असलेला प्रकाश म्हणजे *सताचा शुभ्र प्रकाश.* प्रकाश निरनिराळ्या प्रकारचा असतो. तो लाल येणे ताम्र वर्णी असतो, पित वर्णी देखील असू शकतो, तसाच तो नील वर्णी देखील असू शकतो.

ध्यान येणे डोळे बंद करून अथवा उघडे ठेवून केलेले आपल्या सद्गुरूंचे अथवा भगवंताचे स्मरण होय. या स्मरणात आपण त्यांची छबी अथवा रुप पाहण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याचबरोबर त्यांचे नामस्मरण देखील करीत असतो.

आता बाबांनी म्हटल्याप्रमाणे, "काही ज्योती त्यांना प्रकाश हवा म्हणून ध्यान करीत नाहीत, तर ध्यान कशासाठी करतात? आपले काही बरे वाईट होऊ नये या भीतीपोटी 
भगवंताचे ध्यान करतात."

येथे प्रश्न पडतो की असे ध्यान कशासाठी करावे? ध्यान भीतीपोटी करावे काय? 

आपले काही बरे वाईट होऊ नये असे जर आपणास वाटत असेल, तर त्यासाठी आपण आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. आपले वर्तन, सद्वर्तनी ठेवावयास हवे. सदाचारी रहावयास हवे. आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या चार तत्त्वांनुसार वागावयास हवे. अशाप्रकारे आपण आपली स्थिती केली, तर ध्यानात मन रमून, आपल्या प्रकाशाची गतीही वाढीस लागून, आपल्याला आपल्या सताच्या दर्शनाचा लाभ होऊ शकेल आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगताहेत, "भीतीपोटी ध्यानधारणा करु नका, तर *ध्यानधारणा भगवंताला पाहण्यासाठी करा.*

पुढे बाबा म्हणतात, "हे सर्व करण्यापेक्षा (म्हणजे भीतीपोटी ध्यान करण्यापेक्षा) आपण असे म्हटले पाहिजे, *" अनंता ! ही आपलीच कृपा आहे. आपल्या चरणांचा आम्हाला ठाव द्या, म्हणजेच स्वप्रकाश द्या, म्हणजे स्वप्रकाशाने मला पूढची वाटचाल करता येईल", मला आपल्या चरणांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.* 

 "हे सता !" "स्वप्रकाश नसेल तर मला कुठेही जाता येणार नाही. त्रिगुणांच्या प्रकाशाच्या अनुषंगाने गेलो तर मला ते अजून मायेत गुरफटवतील." 

बाबा पुढे सांगतात, *लक्षात ठेवा, गरीबी परवडली पण अमीरी नको.* 

म्हणूनच आपले बाबा म्हणतात, आपण काय म्हटले पाहिजे, *"सता !" आम्हाला काय पाहिजे तर केवळ तुमचे चरण!"* 

स्वप्रकाशाची मागणी या करीता आहे. ही मागणी तुम्ही मागितली अन् त्यांनी तुम्हाला दिली तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. अन् अशा गतीने प्रत्येक भक्त जाऊ लागला तर, एकनाथांनी सांगितले ते योग्यच आहे. 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सर्व संतमंडळी या गुरुकुलातल्याच ज्योती होत. स्थुल सुटल्यानंतर त्यांना परत गुरुकुलातच सामावून घेतले जाते. सत त्यांना ज्या ज्यावेळी आवश्यकता असेल, त्या त्यावेळी कर्तव्यासाठी आदेश देऊन पाठवितात. हे अनुभवसिद्ध आहे म्हणूनच एकनाथांनी अनुभवसिद्ध मागणी केली. मागितले काय? तर फक्त *स्वप्रकाश!"*

आपण पहातो लोक वेगवेगळे उपास तापास करीत असतात. शरीराला झीजवत असतात. पण लक्षात ठेवा ! *शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. हे शरीररूपी मंदिर आत असणा-या *मा* चे म्हणजेच *आत्म्याचे* मंदिर 
समजून ठेवल्यानंतरच, आतमध्ये मन स्थिर राहील.*

(13) क्रमश:

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल*

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
              *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)
        
  *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल*
        *नांदतो केवळ पांडुरंग*

चोखोबा कोण होते? तर विठ्ठलाच्या देवळात झाडू मारणारे एक भक्त. 

विठ्ठलाला चोखोबा महार आहेत याचे सोयर सुतक नव्हते. विठ्ठल कोण होते? तर साक्षात भगवंत. भगवंताला जाती, पाती काहीही नसते, मग त्यांचा भक्त जातीने कुणी कां असेना? ह्या जाती-पाती कोणी निर्माण केल्यात? तर समस्त मानवानीच नां?

पण तोच चोखोबा म्हणतो, "काया हिच पंढरी आहे" आपली काया म्हणजे आपले शरीर अर्थात आपला हा पंचमहाभूतांचा देह, तर हिच पंढरी आहे. म्हणजेच पांडुरंगाचे स्थान असलेले ठिकाण आहे. अन् त्या देहाच्या पंढरीत हा विठ्ठलरुपी आत्मा आत विठेवर वास करीत आहे ह्याची आपले बाबा आपल्याला जाणीव करून देतात.

बाबा पुढे विचारणा करतात, "आम्ही पंढरपूर कोठे पहातो अन् आमच्या चोखोबाने पंढरपूर कोठे पाहिले? चोखोबा अडाणी असून त्याला हे कळले, मग तुम्ही सांगा, अडाणी श्रेष्ठ कि सुशिक्षित श्रेष्ठ! 

परम् श्रेष्ठ आपल्या बाबांनी म्हटलेलेच आहे, तसेच 
संतानी देखील सांगितलेलेच आहे, *जेथे मांडीले ढोंग, तेथे कैचा आला पांडुरंग* म्हणजेच जेथे ढोंगच ढोंग मांडलेले आहे, अशा ठिकाणी पांडुरंग कसा बरे येईल?

म्हणूनच बाबा पुढे विचारणा करतात, "ज्या ठिकाणी ढोंग आहे तेथे पांडुरंग कसा बरे येईल आणि कुठून येईल? 

*पांडुरंग म्हणजे शुभ्र प्रकाश, पांडुरंग म्हणजे भगवंत !* अशा ठिकाणी तो तेथे स्थिर राहू शकेल का?* 

तो जर स्थिर रहावयाचा असेल, तर त्याकरीता आपली सद्गुरू माऊली म्हणते, "भक्ताने ढोंग रहित होणे गरजेचे आहे. सतशुध्द गतीने वाटचाल करने गरजेचे आहे. मगच तो स्वप्रकाश पहाता येईल. 

त्याकरीता परम् पूज्य श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सेवेक-यानों, मायारहित व्हा, शुद्ध व्हा. सर्वस्व जीवन हे त्यांचेच (म्हणजे सताचे) आहे."*

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, आपण केवळ निमित्त (मात्र) आहोत. या मृत्युगोलार्धात, जन्म घेणे अन् अदृष्य होणे हा सिद्धांत आहे. सतयुगापासूनचे ऋषी-मुनीं आजदेखील सानिध्यात आहेत. ते आपल्या (अध्यात्मिक) शक्तिच्या जोरावर अदृष्यही होऊ शकतात.

म्हणून पुढे बाबा म्हणतात, *"ही शक्ति तुम्ही सुद्धा कमाऊ शकता, पण केव्हा तर स्वप्रकाश मिळेल तेंव्हा."* 

*स्वप्रकाश मिळाला नाही तर तुम्ही काही करु शकणार नाही. मग पुनरपी जननम्, पुनरपी मरणम्!* 

चौर्याऐशी लक्ष योनी तुमची वाट पहातच असते. मानव योनीचा फेरा चुकला अन् उरलेल्या त्र्याऐशी लक्ष योनीत जर तुम्ही भटकत राहिलात, मग तुम्ही सत् सानिध्यात कधी येणार? अशी विचारणा आपले बाबा आपणांस करतात.

आणि पुढे जाणीव करून देताना म्हणतात, *हक्काने मानव जन्म मिळाल्याखेरीज सद्गुरु सानिध्य मिळणे दुरापास्त आहे.* 
(14)  क्रमश:

मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

अमृतवाणी

 *प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
                            *अमृतवाणी*

      काळ(यम) हा सारखा फिरत असतो. काळाच्या गतीबरोर मोजमाप असते. ती झडप घालायला पहाते, शिकारी जसा आपला भक्ष्य मिळाल्याबरोबर झडप घालणार.

       जे दिसते आहे ते नाशिवंत आहे व तेच तू माझे म्हणतोस. पण दिसत नाही अन् शाश्वत आहे ते तू माझे म्हणत नाहीस. आज ना उद्या आपण जाणार. पण जाण्यापूर्वी ज्याने हे जाणले आहे तोच सावध!

जो सावध तो दिनवाणी नाही, तो तन्मय असतो. अशी ज्योत समर्थ चरणांजवळ जाणार.

जन हे जनता जनार्दन आहे. तुझ्या ठायी ईश तत्व आहे. गुण्यागोविंदाने वाग व नामात दंग रहा. सत् गतीने वाटचाल कर.

मानवांच्या मनोभूमीमध्ये दोषांची मळी उत्पन्न होईल. दोष रहित असली तर शांती मिळणार. दोष आपल्याला अधोगतीला नेतात. कारण मनाची भूमी ठाम नसल्यामुळे.

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढ़निश्चयः।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥

सत् उपासक ज्योत दोषातून मुक्त होते.

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।
जनी निंद्य तें सर्व सोडूनि द्यावे।
जनी वंद्य तें सर्व भावें करावें।।