मन हा असा वारू आहे , सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्या वरवरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?
मनाच्यावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही, केले नाही, करविता नाही हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचिर्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.
जो गुरू ब्रम्हउपदेशक आहे, सात्विक तत्व आहे, अविनाशी परम तत्वाची जाणीव देण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, त्या परमपदाप्रत स्थिर करण्याची पात्रता ज्याची आहे असाच गुरू हवा.
गुरुतत्व अर्थात असा गुरू अहंकारी असता कामा नये. अशाच गुरूला शरण जा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वाटचाल करा. अन ती केलीच पाहिजे. मग ते गुरू स्वत: तुम्हाला सुखी करतात, शांती देतात.
मानवाच्या मनाची ओढण त्या गुरुउपदेशाप्रमाणे असायला हवी. मग ते सांगतात मी तुझ्यातच वास करून आहे.
परब्रम्ह हे त्रिगुणावेगळे आहेच आहे परंतु त्यातच ते सामावलेले देखील आहे. त्रिगुण रहित ते परब्रम्ह आहे. याचे सार म्हणजे लिनत्व असेल तरच मेख सापडेल, अन्यथा सापडणे शक्य नाही. आपला अंत कळू देणार नाहीत कारण अनंत लाघवी शक्ती आहे.
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)
टायपिंग असिस्ट: श्री रविंद्र वेदपाठक