मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?


सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?
      वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !! .......गुरुगीता
सद्गुरू म्हणजे देहधारी जडमूर्ती या भावनेने व अर्थाने त्याजकडे पहावयाचे नाही. तर याहीपलीकडे जावून सुक्ष विचारांती, सद्गुरू म्हणजे बुद्धीच्या अतीत असलेला आत्मा होय ! दुसरे काही नाही. हेच सत्य आहे. म्हणून त्याची प्राप्ती होण्याकरिता बुद्धीवानाने प्रयत्न केला पाहिजे. मूळमाया – जिस अविद्या असे म्हणतात – तिच्यायोगे देहाचे व जगाचे भान होते. आत्मसाक्षात्काराने तिचा निरास होतो व सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. इतक्या उच्च अर्थाने विचार केल्यास नित्य, पूर्ण, निराकार व निर्गुण असे परब्रह्मस्वरूप हेच सद्गुरूंचे स्वरूप होय.
सध्या जनतेमध्ये शारीरिक व मानसिक दौर्बल्याबरोबर आत्मिक बलाचाही –हास होत आहे, असे दृष्टोत्पत्तीस येते. यावर उपाय काय?
समाजात एकी उत्पन्न होऊन त्याची सामाजिक, आर्थिक व अन्य त-हेने उन्नतावस्था होणे अत्यंत जरूर आहे; पण त्याचबरोबर पूर्वकालीन द्विजांमध्ये व हल्लीही काही विभूतींमध्ये वसत असलेले सद्गुण म्हणजे शांत वृत्ति, तेजस्विता, त्यागवृत्ति व समाधान; तसेच कर्तुंमकर्तम् शक्ति आदिकरून गुणांचा प्रकाश कसा होईल इकडेही लक्ष दिले पाहिजे.
समाज हल्ली त्रिविध तापाने पोळला आहे व त्याची अंतर्मुख दृष्टी होऊ लागली आहे तेव्हा उपरिनिर्दिष्ट गुणांचा अभाव होऊन ही अधोगती का झाली याचा खोलवर विचार करणे जरूर आहे. इतिहासाकडे पहिले तर असे दिसून येईल की, द्विजानी परिस्थितीप्रमाणे आपद्धर्म म्हणून पुष्कळ वृत्ति स्वीकारल्या व वैशिष्ट्य कायम ठेवून हिंदुधर्म राखण्याचा प्रयत्न केला; परंतु आपद्धर्माची मर्यादा सध्या येथपर्यंत गेली आहे की, द्विजांनी – विशेषत: ब्राह्मणांनी – जवळजवळ आपले सर्व आचार व कर्मे सोडली, असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच आध्यात्मिक शक्ति वाढविण्याचे त्यांना नेमून दिलेले जें ज्ञान व उपसानादि मार्ग, तेही त्यांनी अजिबात सोडले. सध्याच्या परिस्थितीत आचार यथासांग होत नाहीत, अशी तक्रार ऐकू येते.  परिस्थितीनुरूप करणारास ते कठीण आहेत असेही नाही; किंवा सर्वतोपरी शक्य नाहीत असेही नाहीत, तरी मानसिक उन्नती करून घेणे व तद्द्वारा आध्यात्मिक तेजस्विता वाढविणे ही गोष्ट सर्वांस साध्य आहे आणि तशी ती सध्याच्या काळी वाढविणे अत्यंत जरूर आहे.
हल्ली बुद्धीप्रामाण्यास फार महत्व देण्यात येते. सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे प्रत्येकाने वागावे, असे सांगितले जाते. पण ही सद्सद्विवेकबुद्धी कोणती? याची मात्र कल्पना बहुतेकांस नसते.
हल्ली, सद्सद्विवेकबुद्धीचा अर्थ – मनास रुचेल व वाटेल ते असा घेतला जातो. परंतु हे चुकीचे आहे. याचा खरा अर्थ असा की, सत् म्हणजे परब्रह्म वस्तू व असत् म्हणजे मायिक सर्व क्षर सृष्टी या दोघांचा विवेक म्हणजे सत् कोणते व असत् कोणते त्याचा विचार करून सद्वस्तुचे ग्रहण करून असद्वस्तूचा त्याग करणे होय. अशी जी बुद्धी ति सद्सद्विवेकबुद्धी होय.
सद्सद्विवेकबुद्धीने खरोखरीच सर्वानी वागावयास हवे. अशा बुद्धीच्या विचाराने वागले म्हणजे अविद्येचा नाश होऊन आत्मत्वाचे ज्ञान होते व त्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. विद्येच्या योगाने प्राप्त झालेल्या या सामर्थ्यामुळे अमृतत्व मिळते, असे केनोपनिषदात सांगितलेले आहे; म्हणून द्विजांनी आपल्या वेदांनी जी उपासना सांगितली आहे, तीच करावयास हवी व त्यातच त्यांचे आत्यंतिक कल्याण आहे.
ब्राह्मण – ब्रह्म जाणे इति ब्राह्मण:, ज्याला ब्रह्माचे ज्ञान झालेले आहे असा तो मग कोणीही असो, तोच खरा ब्राह्मण होय. प्रणवोपासना या ग्रंथात लेखकाने दिलेल्या टीपेनुसार ‘ब्राह्मण’ हा शब्द ब्रह्म जाणण्याची इच्छा करणार या अर्थी व ज्याला गायत्रीची उपासना करण्याचा अधिकार आहे असा या अर्थी वापरण्यात आला आहे असे म्हटले आहे. (पृष्ठ : २१)   
ज्ञानवान जें ब्राह्मण होते त्यांनी आपली उपासना दृढ करून व सतत अभ्यासाने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. प्रणवरूप जी गायत्री तिचेच अखंड ध्यान करून तिचे ज्ञान प्राप्त करून घेतले. व्यक्त ओंकार व अव्यक्त ओंकार यांचा साक्षात्कार ते मात्रालयाभ्यासाने करून घेत व अखंड ब्रह्मानंदात निमग्न होत ! अशी ही सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, अर्धमात्रात्मक प्रणवसंवितीची उपासना सोडून भलत्याच मार्गाने जाणे म्हणजे अधोगति प्राप्त करून घेणे होय. ब्रह्मा, विष्णु व महेश ज्या आदितत्वाची उपासना करतात अशी सर्वश्रेष्ठ उपासना सोडणे म्हणजे मूळ सोडून शेंडा धरण्यासारखेच होय. 
प्रणवोपासना ही सर्व सांप्रदायिक उपासनांची जननी आहे. या उपासनेचे प्रयोजन म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधून निरंजनस्वरूपी लीन होणे, हे होय. अविद्यादि बीजांचा समूळ नाश होऊन ब्रह्मसाक्षात्कार होणे व निरतिशयानंद सुखप्राप्ति होणे, हे याचे फल आहे आणि दृढ अभ्यास हे साधन आहे व ब्रह्मसाक्षात्कार हे साध्य आहे.
ज्ञानमार्गात ‘गुप्त’ असे काही नाही. थोर सत्पुरुषांनी व साधुसंतांनी आपले अनुभव ग्रंथरुपाने स्पष्टपाने जगापुढे ठेवले आहेत. ज्ञान स्वयंप्रकाशरूप आहे.  
सौजन्य: प्रणवोपासना .............श्री म वैद्य  

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

मुख्य सद्गुरूंचे लक्षण


मुख्य सद्गुरूंचे लक्षण / आधी पाहिजे विमल ज्ञान /
निश्चयाचे समाधान / स्वरूपस्थिती //
म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन / स्वधर्म कर्म आणि साधन /
कथा निरुपण श्रवन मनन / नीती न्याय मर्यादा //
समर्थ ग्रंथराज ..........द. ५ स.२

गुरुचे कृपें सभाग्यां कुंडलिनी जागृती सुलाभ जयां /
सद्गुरू संनिध नसतां मार्गी कोठें असो दिसेल तयां //


श्रद्धेनें गुरुविण जरि करी नर अभ्यास नित्य नियमानें /
ग्रंथोक्त, युक्त पथिं हा त्वाम लावुनि दु:ख कां न विलया ने ?

सहस्रदलपंकजे सकलशीतरश्मिप्रभम् !
वराभयकरांबुजं विमलगंधपुष्पाम्बुजम् !
प्रसन्नवदनेक्षणं सकलदेवतारूपिणम् !
स्मरेत् शिरसि हंसगं तदभिधानपूर्व गुरुम् !! (गुरुगीता) 



शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग तिसरा)

सगळे कसे आहे? तर महेशासारखे. त्यांची उपासना कशी आहे? तर “ॐ नम: शिवाय”. पण जरी महेशचे गण असले तरी सताला आदर देतात.

आपणास कल्पना आहे, समंधाने आपल्या ज्योतीला त्रास देऊन हैराण केले, तेव्हा आम्ही देखील ठरविले या समंधाला हैराण करून त्याचा नाश करावयाचा. मग पितामहानां सांगून महेशाकडे एका भैरवाची मागणी केली.

आता तुम्ही सांगा, भैरव असून तो आसनासमोर कसा काय नतमस्तक झाला. अन् आम्हालाच विचारता झाला, “काय संदेश आहेत?” आता हे कसे काय?

लक्षात घ्या, त्रिगुण सताला मानतात अन् त्यांचे लष्कर देखील सताला मानते. तुम्ही पाहता, महान महान दैवते देखील सताला मानतात. सध्याच्या युगात कोणालाही सत् भक्ति नको, कारण, सत् भक्ति कशी आहे? तर शांत ! आज ही जगात चालली आहे ती भक्ति नव्हे. भक्ति फार वेगळी आहे.

आपल्याला शुभ्र प्रकाश पाहिजे. नामस्मरण करा. मन संपूर्ण सत् मय करा. लक्षात घ्या, मन सत्-मय कसे होईल? तर संपूर्ण अर्पण केल्याखेरीज मन सत्-मय होणे शक्य नाही. म्हणून आम्ही आसनावरून सदोदित सांगत असतो, सेवेक-यांनो, मन सत् मय करा. काही ज्योती थोड्या अवधीपुरत्या मन सत्-मय करतात अन् पुन्हा मायाबाजारात अडकल्यानंतर सतापासून लांब जातात. मन सत्-मय करतांना आशी-पाशी बघत बसू नका. मन सत्-मय करण्याची तुमची प्रवृत्ती असते, हे आम्ही मानतो. पण त्या प्रकृत्तीचा देखील कस घेतला जातो. जो सत्-मय बनण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातच आजूबाजूला मोहमाया पसरवली जाते. खरोखरीचा भक्त असेल तर तो म्हणतो मला एकच माहिती आहे, माझे सत् हेच खरे आहे. अन् असाच भक्त टिकतो. पण बाकीचे दुरावतात. लक्षात घ्या, आपल्याबरोबर काय जाणार? सत् वा असत कृती! सत् असेल तर सान्निध्य देतील पण असत असेल तर सान्निध्य देणार नाहीत.
ज्ञानमार्ग म्हणजे प्रकाश ! हा ज्ञानमार्ग कशामुळे प्राप्त होईल? तर भक्तीच्या अनुषंगाने गेल्यानंतर ज्ञानमार्ग प्राप्त होईल. भक्ति म्हणजे काय, तर नामस्मरण !  अशा त-हेने भक्तिमार्गाने वाटचाल करीत गेल्यानंतर ज्ञानमार्गात पदार्पण करता येते. तुमच्यातील ज्योतींना सत्-पदाच्या आसनावरून अखंड नाम दिलेले आहे. पण काही ज्योतींना अजून ते मिळालेले नाही अशा काही भावी ज्योती देखील आहेत. अशा ज्योतीं देखील सद्-गुरु ! सद्-गुरु ! असे नामस्मरण करतील तर त्या देखील भक्तिमार्गाने जात आहेत असे म्हणता येईल.

ज्ञानमार्गात पदार्पण केव्हा होते? तर ज्यावेळेस सद्-गुरु अनुग्रहित करतात तेव्हा ! त्यावेळी ज्योतीस ज्ञानमार्ग मिळाला असे म्हणता येईल. प्रकाश मिळाल्याखेरीज ज्ञानमार्गाची गती सापडणार नाही. प्रकाश मिळविण्यासाठी सद्-गुरूंची सेवा करणे हे प्रत्येक सेवेक-याचे आद्य कर्तव्य आहे. सद्-गुरु प्रसन्न होतील, आदेश सुटतील, प्रणव मिळतील, तद्-नंतर अखंड नाम
सत्-पदावरून मिळेल. नंतर तुम्हाला ज्ञानमार्गाची चाकोरी माहित होईल, जाणीव मिळेल.
  
ज्ञानमार्ग आहे कठीण पण तसा तो सुलभही आहे. सुलभ कसा? जर ज्योतींचे मन अत्यंत शुचिर्भूत शुद्ध असेल तर अशा ज्योतीला ज्ञानमार्ग सुलभ आहे. पण या कलीयुगात मायावी मन हेलकावे खात असते. जरी आज या दरबारात बसून अत्यंत शुद्ध-शुचिर्भूत होऊन तुम्ही प्रवचन ऐकत आहात, पण या दरबारातून खाली उतरल्यानंतर ! इथे तुम्ही प्रवचन तन्मय होऊन ऐकता पण येथून गेल्यानंतर !

हे “पण” आहे ते संपले की मग खरा ज्ञानमार्गाचा मार्ग चोखाळता येतो. त्याकरिता हा “पण” संपला पाहिजे. परंतु हा “पण” संपत नाही. ज्ञानमार्गाच्या गतीने जायचे असेल तर “पण” आणि “परंतु” असता कामा नये. तेथें ठामपणा पाहिजे की मला हे केलेच पाहिजे. दृढनिश्चयी झाले पाहिजे.

भगवंतानी अर्जुनाला सांगितले होते, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”. जर आपण चालढकल केली तर ज्ञानमार्ग आपल्याला कसा मिळवता येईल?

ज्ञानमार्गाकरिता नामस्मरण हे अन्न आहे, खाद्य आहे. अखंड नामाच्या गतीशिवाय ज्ञानमार्ग मिळणे कठीण आहे. अखंड नाम प्राप्त झालेलेच ज्ञानमार्गाच्या गतीने जावू शकतील. पण अखंड नाम ज्यांना प्राप्त झाले आहे अशा ज्योती कशा हव्यात तर दृढ:निश्चयी. चालढकल करणा-या असून उपयोग नाही. ज्योतीने मनाशी असा दृढ:निश्चय करायला हवा की उठता, बसता मी नामस्मरण करीन. कारण नामस्मरणापलीकडे दुसरा मार्ग नाही. लक्षात घ्या, आम्ही देखील सदोदित अखंड नामाच्या गतीत असतो. नामावेगळे या त्रिभुवनात दुसरे काहीही नाही.

ज्ञानाचा, चैतन्याचा गाभा म्हणजेच नाम आहे. हा चैतन्याचा गाभा यालाच पांडुरंग म्हणतात, तेच नाम आहे. पांडुरंग हेच नाम आहे. पांडुरंग नामातीत असल्यामुळे तुम्हाला आकार दिसत नाही, पाहता येत नाही.  ते साकारल्यानंतर तुम्हाला आकार दिसतो, हे नामच सर्वस्व आहे. म्हणजे ज्ञानमार्गाचे मूळ कोठे आहे, तर सद्-गुरुंजवळ ! मग ज्ञानाबद्दल विचारणा कोणाकडे करायची, तर सद्-गुरुंकडे ! मार्गदर्शक कोण? तर सतच मार्गदर्शक आहेत. तुम्हाला सहाय्यभूत होण्यासाठी तत्वांना आदेश देऊन मदत करायला सांगतात. पण ज्योतीला जर प्रकाशाचा अनुभव नसेल तर पाठविणार कोठे?

तुकारामांनी म्हटले आहे, “ज्योतीच्या प्रकाशे पाहीन तुझे रूप”. बाबा चैतन्यांनी अनुग्रहित केल्यानंतर तुकाराम म्हणाले की, “माझ्या ज्योतीच्या प्रकाशाच्या सहाय्याने तुझे रूप माझ्यात कसे वास करीत आहे ते पाहीन.”

पण ज्ञानमार्गाशिवाय ते असे म्हणू शकले असते का? प्रकाशाची जाणीव नसेल तर ते असे म्हणू शकतील का? तसेच नामदेवांनी देखील म्हटले आहे, “डोळियांचा डोळा उघडिला, आनंदाच्या डोही पाहिले” म्हणजे प्रकाशाच्या गतीने मी आज पांडुरंगाला देवळात पाहत आहे, अन् माझ्यात देखील पाहत आहे. म्हणून ते पुढे म्हणाले, “कदा न विसरे पाय खेचारांचे”.

लक्षात घ्या, सर्वस्व व्यापून उरलेले ते सतच आहे. विठ्ठ्ल, पांडुरंग, विष्णू, ब्रह्मदेव हे सर्वस्व मायेने विखुरलेले आहेत. पण या सर्वात असून अलिप्त असणारे तत्व म्हणजेच सत् आहे. मग ठाम होऊन सताचाच पाठपुरावा केला तर आम्ही खात्रीने सांगतो, तुम्हाला ज्ञानमार्ग सापडेल.

एकाच योनीत हे होणार नाही हे तितकेच सत्य आहे. एका योनीत हे प्राप्त होत नाही, त्याकरिता कितीतरी जन्म घ्यावे लागतात. आजपर्यंत तुम्ही किती जन्म घेतलेत, किती जन्मात तुम्ही सान्निध्यात होता, अन् किती जन्म तुम्ही घेणार आहात याची सर्वस्व जाण त्या अनंतांना आहे. परंतु आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. आपल्याला मानव जन्मात कशाला पाठविले आहे याची आपण जाण घेतली पाहिजे. माया सर्वास्वात विखुरली आहे. आपल्याला माया नाही तर सत् संचय करावयाचा आहे. मायावी त-हेने नव्हे तर सत् संपत्तीने सेवेकरी करोडपती बनला पाहिजे. अखंड नामाच्या गतीने तो अब्जोपती हवा.

अनुग्रहित ज्योत, प्रकाशित ज्योत कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही हे आम्ही खात्रीने सांगतो. कारण चुकीच्या मार्गाने गेली तर लाघव होण्याचा संभव असतो. चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर सत् तुम्हाला सोडणार नाहीत. त्यांना कल्पना असते, इतके जन्म या ज्योतीने घेतलेले आहेत, ज्योतीला सान्निध्य मिळालेले आहे, सान्निध्य देऊन अनुग्रहित केलेले आहे, अखंड नाम सत्-पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे. एवढे असून देखील ज्ञानमार्गाची चाकोरी सोडून हा विचित्र मार्गाने कसा काय जात आहे? म्हणून थोडेसे लाघव करतात. प्रेम असल्याशिवाय लाघव होणार नाहीत. आम्हाला माहित आहे, या कलीयुगात खूप ज्योती व्यापलेल्या आहेत. या व्यापातून सुटण्यासाठी रानोमाळ भटकतात. अनेक मार्ग पत्करतात, पण भक्तिमार्ग म्हटले की बिचकतात.

एकदा असेच व्यापलेली एक ज्योत, पेशाने शिक्षक, दर्शनाकरिता अली, अन् आम्हाला उलट सुलत प्रश्न विचारू लागली. आम्ही त्यांना विचारणा केली, आपण एका देवाचे तरी नामस्मरण योग्य त-हेने करता का? आज रामाचे नामस्मरण करता, तर उद्या कृष्णाचे करता. तर कधी शंकराचे करता, मग कोणता  देव आपणासमोर येणार? तुम्हाला राम कोण, हेच जर कळलेले नाही, मग नामस्मरणाचा उपयोग काय? ज्योत विचारती झाली, मग आम्ही काय करावे? आम्ही सांगितले, आहे राम म्हणजेच ओंकार. त्यांचेच हे स्थान आहे. या स्थानात भक्ति आहे. ज्योतीला भक्ति नको होती, त्यांना हवी होती माया. त्या ज्योतीबरोबर असलेली दुसरी ज्योत सांगू लागली की आम्ही देखील गणपतीची उपासना करतो. आम्ही त्यांना सांगितले, “गणपती म्हणजे सुद्धा ओंकारच”! तुम्ही ओंकारांची उपासना करून देखील तुम्हाला त्रास होत आहे, म्हणजे नक्कीच तुमचे काही तरी चुकत असले पाहिजे. काय चुकत आहे हे माहित करून घेण्यासाठी तुम्ही भक्ति केली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला तुम्ही काय चुकत आहात ते कळणार नाही. तुम्ही संकष्टी, विनायकी असे उपास करता. पण उपास गणपतीने करायला सांगितलेले नाही. गणपतीने सांगितले आहे, तुम्ही पोटभर जेवा, पण माझे ध्यान करा. तुम्ही एवढे उपास करता मग गणपती तुम्हाला प्रसन्न का झाला नाही?  दोन्ही ज्योती निरुत्तर झाल्या. मग आम्ही सांगितले, श्रद्धा असेल तर इथे या, आसनाचे घटक व्हा. मग पहा काय होते ते? आमच्या येथे भगतगिरि नाही. वेडपट लोकं देखील मानवात भटकत आहेत. पण भक्ति करा म्हटल्यानंतर यांना जणूकाय ओझे उचलल्यासारखे वाटते.

भक्ति ओझे वाटावी अशी आहे का हो? तर नाही. अशा वेडपट मानवांना नाम म्हणजे काय हे कळले असते तर? अरे ! नाम ही कामधेनु आहे. नाम म्हणजेच सर्वस्व आहे. असे मानव जर म्हणू लागले, नामस्मरण सोडून बाकीचे सांगा तर मग अशा लोकांना काय सांगावे? अनंतांनीच आम्हाला सांगितले आहे, “नाम म्हणजेच मी ! मी नामातीत आहे”. मग जर ते नामातीत आहेत मग ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र त्यांच्या वेगळे आहे का? ज्ञानमार्गाचा शोध लागल्याशिवाय त्यांचा शोध लागणार नाही. म्हणूनच ज्ञानमार्गाने जाणे, प्रकाशाच्या गतीने जाणे यथायोग्य होय. भक्तिमार्गाशिवाय ज्ञानमार्ग प्राप्त होणार नाही. प्रथम भक्ति अन् मग ज्ञान. म्हणजें प्रथम नामस्मरण ! नामस्मरणाखेरीज ज्ञानमार्ग प्राप्त होणार नाही. प्रथम भक्तिमार्ग अन् तदनंतर ज्ञानमार्ग ! आपला सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने जावू लागला तर आज ना उद्या त्याला प्रकाशाचा मार्ग सापडेल. पण आपली जी चार तत्वे आहेत, ती मात्र त्याने टिकवली पाहिजेत. या चार तत्वांना तुम्ही चार वेद म्हटलेत तरी चालतील. अर्थात हे आमचे चार साधे वेद आहेत. जो सेवेकरी या चार वेदांचे काटेकोरपणे पालन करील त्याला एकदातरी मी स्थुलाने दर्शन देईन असे अनंताचे संदेश आहेत. स्थुलाने दर्शन देईन पण ओळखणारा पाहिजे. पण सद्गुरूंना, अनंतांना जर तुम्ही बनवू लागलात तर चूक कोणाची? तर चूक भक्तांची येणे सेवेक-यांची. सेवेक-याने जर ठाम निश्चय केला की मी बनवा बनवी करणार नाही अन् चारी तत्वांचे पालन करीन मग दर्शन कां बरे मिळणार नाही? एकदा कां चरणांवर स्थिर झालात की प्रकाश उजळलाच म्हणून समजा. तुकारामांनी म्हटले आहे, ज्योतीच्या प्रकाशे पाहीन तुझे रूप !!
एकदा कां प्रकाश उजळला मग दिवसही नाही अन् रात्रही नाही. मग ते सतत चालूच असते. दिवसाही चालू अन् रात्रीही चालूच राहतो. कबीराने म्हटले आहे, “बुझे नही बत्ती”. तो प्रकाश मिळवणे म्हणजेच ज्ञानमार्ग मिळवणे. सद्गुरु कृपेने मिळालेले जें एक अखंड नाम, ही जी एक संपत्तीची ठेव मिळालेली आहे ती वाढवून परमगतीला जाता आले पाहिजे. अखंड नामाची करोडपती संपत्ती मिळवली पाहिजे. मायावी संपत्ती नव्हे. अखंड नामाची संपत्ती वाढणे म्हणजे संचित संपविणे होय.

आपण पाहतो, आपले गुरुदेव वशिष्ठ व इतर ऋषी-मुनी आज वर्षानुवर्षे अखंड नामात आहेत. त्यांचे नामस्मरण चालूच आहे. ऋषी-मुनी म्हणतात, हेच सर्वस्व आहे. या पलीकडे आम्हाला दुसरे काही नको. म्हणून आज ते सतत अनंताच्या सान्निध्यात आहेत. जसे, दृश्यांना प्रेम असते तसे अदृष्यांना देखील प्रेम असते. तुम्ही पाहता, पितामह सतत जेथे सत् आहे तेथें असणार. असे का ? तर  त्यांच्या संपत्तीची गणना करता येणार नाही. तुम्हाला तेवढे जरी होता आले नाही तरी निदान सत् संपत्तीने लखोपती बना. असे लखोपती जर तुम्ही बनत गेलात, असे जर अखंड नामयुक्त झालात मग ज्ञानमार्गाला वेळ नाही. तो क्षणात प्राप्त होईल.
 
पूर्वी दरबारात सर्वांनाच प्रकाशित करत असत परंतु त्यांना प्रकाश टिकवता येत नसे. म्हणून आता संदेश दिलेत, कष्ट करून प्रकाश मिळवू देत. त्यांना आयते मिळाल्यानंतर त्याची किंमत नाही. बाकीचे कसलेही कष्ट नाहीत, पण मन केन्द्रीकरणाचे कष्ट आहेत. जर तुम्ही मायेत केंद्रीकरण करू शकता मग सतात कां केंद्रीकरण करू शकत नाही. सताचेच नाम आहे. नामावेगळे सत् नाही अन् सतावेगळे नाम नाही. मग नामस्मरण करायचे कोणी ? भक्ताने केले पाहिजे. पण आपण ते करतो का? तर करत नाही. कां करत नाही? कारण आपल्याला माया श्रेष्ठ वाटते. आपल्याला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, संपत्ती पाहिजे, आराम पाहिजे अन् हे सर्वस्व मिळाले तर आपले बाबा खरे ! या भक्तीमध्ये सर्वस्व सामावलेले आहे. मुक्ती-मोक्ष  आहे, सायुज्यपद आहे, संसार देखील आहे.

अरे ! सगुणाचे सार म्हणजेच संसार ! सगुणात मी नाही असे तत्वच नाही. तुमच्या मनाजवळ जर चंचल वृत्ति असेल तर तुम्ही ज्ञानमार्गाने जावू शकाल? आपण मानसिक त-हेने व्यापलेलो असलो तर आपल्याला शांत निद्र येत नाही. म्हणून सर्वात प्रथम सद्गुरु सेवेक-याला संसारात स्थिर करतात अन् मगच त्याला नामस्मरण करायला सांगतात, पण सेवेक-याकडे आळस असल्यानंतर काय होईल. आळसामुळे शरीराला विश्रांती मिळते. नामस्मरण करायला नको, ध्यानधारणा करायला नको. मनाला ओढण लावायला नको. अशाने ज्ञानमार्ग मिळणे दुरापास्त आहे. प्रकाशाची जाण मिळणे हे देखील भाग्यच आहे अन् त्या प्रकाशाच्या गतीत दर्शन मिळणे हे त्याहूनही भाग्याचे आहे.

प्रकाश मिळाल्यानंतर तुम्ही स्थूलातून कारण देहांत जावू शकाल, महाकारण देहांत जावू शकाल. महाकारण देहातून अणु, रेणु, परमाणु पर्यंतही जावू शकाल. सगळीकडे सत् आहे. पण प्रकाश नसेल तर तुम्ही काय कराल? अनुभवाचे मिळविण्यासाठी ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग म्हणजे अखंड नामाचा स्त्रोत. नामस्मरण म्हणजेच अनंताचा जयजयकार ! मग अनंत म्हणतात की, तू मला प्रकाशात पाहू शकतील. अंधारातही मी तुला जाणीव देऊ शकेन. तुझ्यातच मी कसा वास करून आहे हे तू पाहू शकशील. हे सर्वस्व मिळविण्यासाठी प्रथम पायरी कोणती तर अखंड शुचिर्भूतपणा पाहिजे. मनामध्ये विकल्प चुकून येता कामा नये. सद्गुरूंच्या बाबतीत तर अत्यंत शुद्ध पाहिजे. कुणाला टिचकी मारून काय वदवतील ते सांगता येणार नाही. पण अशावेळी सेवेकरी मनाने अत्यंत ठाम असला पाहिजे. अशा ठाम सेवेक-याला ते सांगतात तू नामस्मरणाने वाटचाल कर. सद्गुरु तुमचे कधी नुकसान करतील असे आम्हाला वाटत नाही. सद्गुरु हे तारक आहेत. वेळप्रसंगी तुमच्यावर चिडतील, लाघव करण्याचे देखील आदेश देतील परंतु वेळ आली तर पाठीशी उभे राहतील. तुमच्या अंतर्यामी दयाघन तत्व आहे. सत्-पद हे दयाघन तत्व आहे.
समाप्त ..............

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग दुसरा)


पार्था तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे, आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन आम्हाप्रत लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो की तुमचे मन सत्मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणववेद पाहता येणार नाही. समजा, पाचवा प्रणववेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरु दर्शन तरी मिळावा. शुभ्रप्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होऊ शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला ते कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का ? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करीत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का ? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थुल गेले. तुमच्या स्थूलात वास करणारे तत्व तुमच्याबरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सताचे सत्-चरण तुम्ही पाहणार आहात ते तत्व मनाला जाणीव देऊन मनाला हलवते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जाण असते. या पंचमहाभूतांच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताना सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जें स्थुल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत? तू आणि सत् एकच आहेत, कवचात तुही आहेस अन् कवचात सत् देखील आहे. आज आपण पाहतो, मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंचमहाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देऊन कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुणांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलात कसे प्रवेश करतात, हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे कां ? मनाने बाजारगप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते.सेवेकरणीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्चर्या केली?
आपल्या आसनाजवळ लाघव आहे. लाघव झाल्यावर, त्रास होऊ लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, लाघव करण्यासाठी चैतन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा. लक्षात घ्या, चैत्यानाला त्यांनीच निर्माण केले. आम्हालाही त्यांनीच निर्माण केले. अधिकारदेखील त्यांनीच बहाल केलेत. अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच. जन्माला त्यांनीच पाठविले. तुमचे पालन-पोषणही तेच करीत आहेत. दाही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असूनदेखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतींना आपली चूक काय झाली हे कळू नये, तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे?
उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्याकडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे? आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? तर नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड, येणे शुद्ध-शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरु कधीही शांत बसणार नाहीत, पण ते बनवाबनवीचे अश्रु असतील तर लक्षही देणार नाहीत.
आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मुनिंबरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते, मग या अशा आसनाच्या सेवेक-याची पातळी कशी हवी? तर अत्यंत उच्च-गतीची हवी.
जरी आपण या कलीयुगात असलो तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत. मग आपल्या विचारांची गति, विशालता, उच्च हवी की नको? ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. अन् ही जाण घेवून त्याप्रमाणे कृतीमान असणे देखील आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथें या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे? त्यांनीच पुढे संदेश दिलेत, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ! तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो. अशा मानवाची जर तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे, अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ठ नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठवील का? आमचे संदेशच असे आहेत, सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुम्हाला मला डोळेभरून पाहता येईल. पवित्र आचरण नसेल तर तू कसा बरे मला पाहू शकशील? मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा कां मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले, मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, यदात्मा दृढनिश्च्ययी मे भक्ता समप्रिय: !! असा दृढनिश्च्ययी भक्त असेल त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणववेदही लगेच प्रगट होतो.
हे जें स्थान आहे ते सत्पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत, तेथें ऋद्धी-सिद्धी नाही, तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तिचा मार्ग नामस्मरण, ध्यान-धारणा अन् मन सतचरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ति केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ति, त्याच्या ठिकाणी अनंतांचा वास. त्या ठिकाणी अष्ठसिद्धी देखील वास करू शकतात. ज्याठिकाणी ॐकारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथें काय शिल्लक आहे? ज्या ॐकारांचे ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ति हात जोडून उभ्या असतात, असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेकर्याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा! पण आपण एवढेच म्हणायचे, अनंता मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो. आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थुल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते. अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथें जवळच असते, पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जर पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणववेद पाहिजे. जें भक्त आहेत ते सत सान्निध्यात आहेत. सुक्ष त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत. पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामिनी म्हटले आहे, वाजे पाउल अपुले, म्हणे मागे कोण आले? जेथे शंकराचे स्थान तेथें पिशाच्च त-हा असणार, पण जिथे श्रीहरीचे स्थान तिथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो सताचा भक्तच आहे. 
क्रमश: पुढे चालू ........3

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग पहिला) परम पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने...

पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होतो? ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयं प्रकाशाच्या गतीने जाने हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद्गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरुंशी बोलणे, चालणे होवू लागले म्हणजेच पाचवा प्रणववेद प्रगट झाला.
जरी पाचवा प्रणववेद प्रगट झाला, तरी त्यातही आपल्याला भर घालवायची आहे. प्रणव येणे बोल. जसे आपण बोलणे ऐकतो, त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ॐ कार् स्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणववेद प्रगट झाला असे म्हणता येईल. मग अशी ज्योत सद्गुरू सान्निध्याने कुठेही जावू शकते. सद्गुरु सान्निध्याशिवाय हे होणे शक्य नाही. पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याशिवाय आपल्याला गुरुगुह्य काय आहे हे समजणार नाही. जोपर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणववेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपले सद्गुरु काय आहेत याची तो जाणीव घेऊ शकणार नाही. आपले सद्गुरु ओळखू शकणार नाही.
पाचवा प्रणववेद सुरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो. आम्ही हे म्हणतो हे खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते की नाही? सद्गुरूंना संदेश द्यावयाचे असतील तर ते कोणत्याही तत्वाला ते देऊ शकतात. हाच तो पाचवा प्रणववेद.
आपण पाहतो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सुक्ष्माने कुठेही सद्गुरूंच्या आदेशानुसार जावून येते की नाही?
पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याखेरीज ही जी देवाण-घेवाणीची त-हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची त-हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण पाचवा प्रणववेद सिद्ध होण्यासाठी सापडण्यासाठी भक्ताने वा सेवेक-याने काय केले पाहिजे? तर नामस्मरण केले पाहिजे.
मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण करतोच आहे, आम्ही नाही असे म्हणत नाही. पण नामस्मरण कसे केले पाहिजे?
नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रह्मानंदाप्रत घेवून गेला पाहिजे. त्या अनंताच्या कानापर्यंत त्या नामास्मरणाचा नाद पोहचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ॐ कारापर्यंत पोचली पाहिजे. लक्षात घ्या, ध्यानधारणेकरीता आसन आहे अर्थात ध्यानधारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण कोठेही करता येते. ते करतांना इकडे-तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार, म्हणून नामस्मरण करताना नाम अशा त-हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच कामा नयेत. नेत्रासमोर केवळ सद्गुरुंचीच छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील. पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन् ते ध्यान ! दोघांची संयुक्तता साधली अन् त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहचतो. अशात-हेने या चाकोरीतून एकदा कां सेवेकरी ऊर्ध्वतेने वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणववेद प्रगट होणारच. पण पाचवा प्रणववेद प्रगट होण्यासाठी सद्गुरु दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरु दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरु दर्शनानंतर सूक्ष्म गति ही पुढची पायरी.
पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर त्याठिकाणी स्थिर होऊन गतिगतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भेदभाव नाही, कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता, महान ऋषी-मुनी होऊन गेले. पण प्रत्येकजण आपापल्या पायरीप्रमाणे राहत होते.
संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून, जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे.
आजचे युग हे कलियुग आहे, येणेच संशययुग आहे. मन चलबिचल होते द्विधा होते. लक्षात घ्या तापते ते आपले मन, आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही घेणे देणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत्. येणेच सद्गुरु !
आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी ! लक्षात ठेवा, शांत राहिल्यानंतर तुम्ही कधीही अनन्तांपासून दूर जाणार नाही.    
पाचवा प्रणववेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी ये आणि सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्याचरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जर सद्गुरुमय बनला, मग वेगळे ते शिल्लक काय राहिले. हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुध्द-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरु मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे ते काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्याठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरु म्हणतात, त्याला मी माझ्या वेगळा का ठेवू? जें मन सतावेगळे दुसरे काही पाहत नाही, मग ते सतापासून दूर राहू शकेल का? तर ते शक्य नाही. अशा ज्योतीला आज नां उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या प्रणववेदाचा गाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत्-चरण मिळवायचे असतील, तर सत्-चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर आपले मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कलीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, सत्युगात जसा कस होता तसा कस आता घ्यायचा नाही. पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसात उतरत नाहीत. फक्त म्हणतात, सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही. लक्षात घ्या, सेवेक-यांनो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल, त्यावेळेस पाचवा प्रणववेद प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही, तर पाचवा प्रणववेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, मन ते मजपासोनी जाण ! मन माझ्यावेगळे आहे कां? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे.
पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि मी ही तेच. त्याठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा.                                     
क्रमश: पुढे चालू.........२..........