सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

अमृतवाणी


हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। 

गुरुदेव पितामह म्हणतात, "स्थुलाला त्रास होऊ लागल्यानंतर मानव सताचे चिंतन करतो." 


मानवाने असे का बरे करावे? उत्तर सोपे आहे. कारण मानव त्याच्या स्थुलाला म्हणजेच त्याच्या देहाला त्रास होवू लागल्यामुळे, त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सताला आठवतो, सताची मनधरणी करतो, सताला विनवणी करतो. त्याचे मन त्या अडचणीच्या प्रसंगी बरोबर, सताची, काकुळतीला येऊन त्या प्रसंगातून सोडविण्याची मागणी मागत असते. अर्थातच मानव सता पुढे साष्टांग लोटांगण घालून विनवणी करीतो की 

सता! मला या त्रासातून सोडवा आणि त्याला शंभर टक्केच काय, तर एकशे एक टक्के खात्री असते की माझे सतच मला यातून सोडवू शकतील.


याच्या विपरीत, "मानवाचे स्थुल आनंदीमय स्थितीने जेव्हा असते, त्यावेळेस मात्र मानव सताला न स्मरता आपल्या मायेच्या कर्तव्यात मशगुल असतो. सताला तो विसरतो. ही मानवी तऱ्हाच अशी आहे. अशावेळी त्याला सताची आठवण न होता आपल्या मायेची, मायेच्या माणसांची स्थिती करावीशी वाटते." आणि येथेच मायावी मानव फसतो. 


सुख असो, दुःख असो किंवा एखादा प्रसंग आपल्यावर आलेला असो, मानवाने सदोदित आपल्या सताची, आपल्या सद्गुरूंची आठवण ठेवावयास हवी. त्यांच्या नामस्मरणात राहावयास हवे, त्यांच्या चिंतनात रमावयास हवे. ज्याच्यामुळे आपल्यावर त्यांचा कृपाहस्त, त्यांचा आशीर्वाद, त्यांचे सर्वांगीण संरक्षण, त्यांचे लक्ष राहिल्याने कठीणातल्या कठीण प्रसंगातूनही ते आपल्याला सोडवतात व आपल्या जवळ घेतात.


म्हणुनच तुकाराम महाराज म्हणतात,

       हेंचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।

           विसर न व्हावा ।। तुझा विसर न व्हावा।।

        गुण गाईन आवडी। हेंचि माझी सर्व जोडी।।

            माझी सर्व जोडी।। हेंचि माझी सर्व जोडी।।

        न लगे मुक्ती आणि संपदा। संत संग देई सदा।।

 ...................................................................

 .............अनगड..........

            


 


मायेचे कर्तव्य स्थुल सुटेपर्यंत संपणारच नाही हे पितामहांचे बोल सत्यच होय. 


स्थूल म्हणजे हा मानवी देह. देह आला की अनंतांचा अंश आला आणि त्यांच्या बरोबर त्यांची माया देखील आली. कारण स्थुल आले की माया आली. स्थुलाला सोडून माया नाही. 


माया म्हणजे हा संसार. संसार म्हणजे सगुणाचा सार! यामध्ये देह आला. देहाबरोबर मन आले. मनाबरोबर स्वत्व आले. स्वत्वा बरोबर अहं आला. अहं आला म्हणजे भांड आला. माझे तुझे आले. हे मायेचे असे गोल गोल फिरणारे दुष्टचक्र सतत चालूच असते.


तेव्हां पितामह म्हणतात, "ह्या सांसारिक मायेच्या दुष्टचक्रा पासून जर आपली सुटका करून घ्यावयाची असेल, तर आपणाला एक साधा सरळ उपाय भगवंताने प्राप्त करून दिला आहे, तो म्हणजे "नामस्मरण" करणे."


पितामह म्हणतात, "पण त्यातूनही वेळात वेळ काढून, (आपण जर आपल्या सताचे, आपल्या सद्गुरुंचे, आपल्या भगवंताचे) "अखंड नामस्मरण" येणे "अखंड चिंतन" केले तर आपणावर 

सताची कृपा होऊन जी आपली क्लेशात्मक स्थिती आहे ती दूर जाईल, ती नाश पावेल, तिचा नाश होईल.


एकदा का क्लेशात्मक स्थितीचा, आपल्या मायावी अडचणींचा नाश झाला की मग आपल्याला, आपल्या होणाऱ्या प्रगतीला कोण रोखू शकणार? आपला अनंताप्रत जाण्याचा मार्ग खुलाच झाला ना? 

           चला तर, 

           करुया सताचे नामस्मरण

           अन्तरी पाहूया सद्गुरुंचे चरण !!

           पाहता अंतरी चरण सद्गुरुंचे

           पार होतील भवसागर मायेचे !!!

......................................................

..............अनगड...........