बुधवार, २७ मे, २०२०

लालबाग सद्गुरु दरबार स्थानांतरण सोहळा


Lalbaug Darbar Shifting - लालबाग सद्गुरु दरबार  स्थानांतरण सोहळा
सदरच्या या विडियो मध्ये वापरण्यात आलेली गीते (भजन, अभंग) हे धार्मिक असल्याने वापरण्यात आलेले असून, त्यापासून कोणत्याही प्रकारचा आर्थिक अथवा इतर लाभासाठी वापरलेली नाहीत.
सौजन्य: गायक अजित कडकडे, सुरेश वाडकर व इतर
विनस विडियो, सुमित म्युझिक.

सद्गुरू वचने


रविवार, २४ मे, २०२०

कोकण आश्रम पुनर्स्थापना सोहळा आणि भंडारा उत्सव - २०१७

कोकण आश्रम (वालावल, कुडाळ) पुनर्स्थापना सोहळा आणि भंडारा उत्सव - २०१७ चा विडियो पहाण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा आणि आनंद घ्या.

https://youtu.be/fpNuRE9L2ro

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

साधना

साधना या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हे सत्य होय. यापैकी च एक म्हणजे *साधना* हा संधीयुक्त शब्द. 

*साधन* + *अ* = साधना (यामध्ये न+अ जोडला की ना होतो)

आता आपण हे लक्षात घेतले पाहिजे की *अ* हा *_अनंतामधील अ_* असे समजूया व त्यांच्याप्रत जाण्याचे जे *_साधन_* आहे ते समजूया *_अनंतांचे नाम_* म्हणजेच जे आपण _अनंतांचे म्हणा, आपल्या श्री सद्गुरू माऊलींचे जे नाम_ घेत असतो, ते असते, त्या _अनंताप्रत किंवा श्री सद्गुरू माऊलींप्रत पोहचण्याचे साधन_ आणि ह्या दोहोंचा जेव्हा व्याकरणातील संधी तयार होतो, त्यावेळेस आपण त्या संधीला *_साधना_*  ह्या नामाभिधानाने संबोधतो. _आहे की नाही गंमत._ याचाच अर्थ असा की *_साधना_*  ह्याचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ अर्थ आहे *_अनंताप्रत जाण्याचे जे साधन आहे, ते आहे, त्यांचे नाम_* आणि हेच *_नाम_* आपण ज्यावेळेस सातत्याने घेत असतो, त्यावेळेस आपल्याकडून होते ते *_नामस्मरण._*

_अशाप्रकारे जर आपण *_साधना_*  केली तर मग *_अनंत किंवा सद्गुरू माऊली आपणांपासून दूर राहू शकेल कां?_*

_म्हणून आपल्याला आयुष्यात काय "साधायचे" आहे हे ठरविणे, आणि ते प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच एका अर्थी साधना करने, हे आपले *_आद्य_* कर्तव्य ठरते._

*_अनगडाची ही बडबड,_*
*_आठवा मनोमनी सत्वर_*
*_कास धरुनीया नामाची_*
*_कापूया दोघांमधील अंतर_*

*_अंतराला देता अंतर_*
*_दिसो लागतील सद्गुरू चरण_*
*_चरणांत लिन होता_*
*_एकरुप होती सकलजण_*

*_द्वैत भाव मिटता ठायी_*
*_अद्वैत भाव जागे मनी_*
*_अनगडाचे चित्त लागे_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*

रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

दर्शन

*_दर्शन_*

*जय राम श्री राम जय जय राम*
*रामापरते अन्य नाही नाम*
*नामातच भरला आहे राम*
*मनी जपा सदा रामची नाम*

*नाम जरी असले राम*
*वेगळा नाही तो घनश्याम*
*श्याम म्हणा अथवा म्हणा राम*
*अखेर अनंतांचे अनेकची नाम*

*नामापरते नाही कोणते साधन*
*पूर्णत्वास जाईल अनुसंधान*
*मनोमनी धरता जाण*
*राम श्यामचे घडेल दर्शन........*
......... *_अनगड_* ..........

शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

अनगडाची ही दुनिया सारी.....

*_खरोखरच आपण आणि आपली पिढी ही खूप खूप भाग्यवान आहे, कारण आपणांस आपले सद्गुरू लाभले._*

*_इतकेच नव्हे तर आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ह्याच वेळेस आणि काळात आपले सव्विसावे अवतारकार्य संपन्न करून आणि आपणा समस्त बंधु-भगिनींस आपल्या जवळ घेऊन, आपले नाम देऊन त्यांच्या प्रत जाण्याचा मार्ग प्रवचन रुपाने समजावून सांगून उपकृत केले._*

_खरोखरच आपण भाग्यवान नाही कां?_ 

*_उजळले भाग्य अमुचे,_*
*_उजळल्या अमुच्या ज्योती_*
*_चरणी घेता सामाऊनी_*
*_मनी गवसले मोती_*

*_मोतीयांचा हार करुनी_*
*_घातला तो गळा_*
*_सद्गुरु प्रसन्न होता_*
*_लाविला नामाचा हो टिळा_*

*_टिळा लाविता नामाचा_*
*_प्रकाश पसरे सारा_*
*_प्रकाशाच्या कल्लोळात_*
*_नजारा दिसे तो न्यारा_*

*_हरवूनी जातो मीपणा त्यात_*
*_उरतो फक्त ओंकार_*
*_ओंकार ध्वनी आळविता_*
*_एकलय होतो अपार_*

*_अनगडाची ही दुनिया सारी_*
*_ज्यास कुणा ती सापडे_*
*_कधीच मागे फिरून न पाही_*
*_लागे मनापासोनी ती आवडे_*

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

सेवा

अवर्णनीय ! सुंदर !! फारच सुंदर !!! फारच छान !!!!

ही जी कांही कर्तव्यें आपल्या गुरुबंधू-भगिनींकडून पार पाडली जाताहेत, ती खरोखरीच वाखाणण्याजोगीच आहेत यात तीळमात्र देखील शंका असू नये. 

यात प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे आपल्या सद्गुरूंमाऊलींप्रती असणारी आपली आस्था, आपली कळकळ, आपले प्रेम, आपले ऋणानुबंध, आपली कर्तव्यनिष्ठा, आपली तळमळ. यामुळे येथे कोणालाही कुठल्याही कामाचा बोजा न वाटता, तो आनंदाने ही कर्तव्यें पार पाडण्यासाठी सदैव तयार व तत्पर देखील असतो, त्याशिवाय तो प्रत्येक कर्तव्यात न चुकता हजर देखील असतो व राहण्याचा प्रयत्न देखील करीत असतो. यदाकदाचित काही कारणाने म्हणा अथवा त्याच्या कार्यबाहुल्यामुळे त्याला जर अशावेळेस हजर राहता नाही आले, तर मात्र तो मनापासून हिरमुसला होतो, आपली आपल्या सद्गुरूंप्रती कार्य करण्याची एक संधी हुकली म्हणून तो प्रसंगी दु:खी देखील होत असतो. 

तरी या सर्वस्वांच्या या तळमळीबद्दल, कळकळीबद्दल किती लिहावं तेवढे कमीच होय. 

हो ! हे जरी खरे असले तरी ही एक गोष्ट नाकारता येणार नाही ती की ही संधी आपणां सर्वस्वांना आपली सद्गुरू माऊलीच वेळोवेळी उत्पन्न करून देत असते व त्यामुळेच हे कठीण कार्य आपण बिनदिक्कतपणे पार पाडू शकत असतो, अन्यथा हे शक्य नसते आणि आपणाकडून झाले ही नसते. म्हणूनच आपण सर्वस्व त्या आपल्या सद्गुरू माऊलींचे सदैव ऋणी आहोत.

जय श्री सद्गुरू माउली !
तू आम्हां भक्तांची सावली !!
करी दया आम्हांवरी इतुकी !
की सेवा करूनी घेसी तितुकी !! 
.......ती आम्हा पेलवे जितुकी !!!

आम्ही काय तुझी सेवा करणार ?
ती संधी तुच आम्हांला देणार !!
तुझीया मनी जेव्हां ते येणार,
तेव्हांच ती, तु आम्हां कडून करुन घेणार !!

त्यासाठीच आम्ही तळमळणार,
ती मिळविण्यासच आम्ही धावणार,
ती मिळताच आम्ही तृप्त होणार
शेवटी अपुल्या चरणी स्थीरावणार !!

अनगड म्हणे, 
*बा ! सद्गुरू राया*
*झिजवू आम्ही अमुची काया*
*स्थिरावेल अमुची माया*
*तुझीया सत्ते*!!!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

नावात काय आहे?

अनगड आणि आनंद. या दोहोंचा संधी होताच "अडगडानंद" होतो. तसाच संगम भक्त आणि भगवंताचा, भगवंताच्या नामानेच होतो. भक्त जेव्हा "नामस्मरणात दंग होऊन जातो, एकलय होऊन जातो", त्याचवेळेस भगवान त्या भक्ताला आपल्या जवळ घेतात आणि आपले दर्शन देतात आणि म्हणतात, "बाळा, बघ ! मी कसा ह्या त्रिभूवनात भरून राहिलो आहे ! बघ, मी ह्या त्रिभूवनात भरून राहिलेला असून देखील अलिप्त सुद्धा आहे."

अवघा आनंदीआनंद जहाला की अनगड काय किंवा अनगडानंद काय? एकूण सगळे सारखेच की. सारेची त्या माऊली पुढे नतमस्तकच असतात. 

अनंताचा तो "आ" आणि नंदाचाही "आ" च. म्हणजेच अनंत येणे "निराकार" आणि नंद म्हणजे "आकार", येणे नाम सगुण आणि निर्गुण. ज्यावेळेस "निराकार" "आकार" घेतात, त्याचवेळेस ते मानवी त-हेने अपुल्या चर्मचक्षूंना दिसून येत असतात. अन्यथा आपण त्यांना फक्त "नामस्मरणाच्या" गतीने गेल्यासच समाधी अंगाने पाहू शकू.

ज्या ज्या वेळी भूतलावर भगवंताची आवश्यकता असते, त्या त्या वेळी "निर्गुण" हे अवतारकार्य धारण करून म्हणजेच अवतार घेऊन पृथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात. याचाच अर्थ असा की "निर्गुण" "सगुण" रुपाने अवतरीत होऊन मानवी त-हेने अपुला कार्यभार सांभाळीत असतात, परंतु आपली जाण मात्र कुणालाच देत नाहीत.

ह्या दोघांचाही जेव्हा कृपाशीर्वाद मिळतो, तोची आनंदाने प्रगट होतो, तेथे मग द्वैत भावना न राहता अवघा आनंदीआनंद भाव तेवढा उरतो. 

शेवटी मानवी त-हेने कोणीतरी म्हटलेले आहेच की नावांत काय आहे? नांव महत्त्वाचे नसून, एखाद्याचे काम अर्थात कार्य महत्त्वाचे असते. कर्तव्य महत्त्वाचे असते.

संतांनी तर त्याहीपुढे जाऊन सांगितले आहे की "ते नाम सोपे रे"....... म्हणून मानवी नावाला महत्त्व न देता आपण अज्ञ बालकांनी आपल्या सद्गुरू नामावर भर देऊन, त्यांचे नामस्मरण करने हितकारक ठरावे.

अनगडाला आनंद झाला, म्हणूनी तोची अनगडानंद जहाला. बाकी मानवी त-हेने बघितले तर नावांत काय आहे? 

याउलट अध्यात्म्याच्या दृष्टीने पाहता, नामातच सगळे भरलेले असून, आपल्या भगवंताच्या चरणांप्रत पोहचण्यासाठी नामस्मरण करने अत्यंत आवश्यक आणि गरजेचे देखील आहे.

अनगड म्हणे,  
         "हे देवा, काय करू मी तूझीच सेवा
                   नित्य निरंतर मजला अपुल्या जवळ ठेवा
          "अपुला कधी विसर न होऊ द्यावा
                    हीच विनवणी करीतो मी देवा 
                    (आपुलिया चरणी) !!!

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

*वेदा पडीले मौन शास्त्रे वेडावली |*
*वाचाही निमाली ते श्रीगुरु ||*

         एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंवर हा अभंग रचलेला आहे. एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी हे होते. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना अनुग्रहीत केले होते. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचे सर्वस्व महत्व जाणले होते. त्यांची महती एकनाथ महाराजांनी गाताना, त्या महतीमध्ये त्यांनी सांगितले आहे, 

*वेदा पडीले मौन, शास्त्रे वेडावली*
*वाचाही निमाली, ते श्रीगुरु*

एकनाथ महाराज म्हणतात, "त्या माझ्या सद्गुरूंची महती काय वर्णावी? त्यांची महती गाता गाता *वेद देखील मौनावले, अन् वाचा देखील निमाली. अर्थात वाचा देखील बंद पडली. इतकेच नव्हे, तर जी कांही शास्त्रें आहेत, ती सुद्धा, त्यांची महती गाता गाता, गुणगान गाता गाता वेडावली*, असे ते माझे सद्गुरू आहेत. अशा जाणीवेने जेव्हा एखादा भक्त आपल्या सद्गुरूंचे नामस्मरण करतो, त्यावेळेसच ते सद्गुरु प्रगट होतात, असे आपले बाबा आपल्याला सांगताहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *वेद म्हणजे ध्वनी, येणे नाम!* ते देखिल लहरीत लयबद्ध होऊन जातात. मन देखील लहरीत लयबद्ध होऊन जाते. अशावेळेस तेथे शास्त्र तरी काय करणार?* 

शास्त्र या ठिकाणी टिकूच शकत नाही. *अखंड नाम देखील त्याठिकाणी लय होऊन जाते.* तेथे काहीच शिल्लक रहात नाही. शास्त्रांना त्या सद्गुरूंचा अंतच लागणार नाही आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगतात, *हे सर्वस्व जाणण्याचा पलीकडे आहे. म्हणजेच जाणीवेच्या पलिकडचे आहे.*

ज्यावेळेस आपण आपल्या सद्गुरू माऊलींचे नामस्मरण करता करता आपले देहभान विसरू व त्यांच्यांच नामात तल्लिन होऊ, त्यांच्या स्मरणात रममाण होऊ, त्यांची छबी आपल्या मनात पाहू, त्याचवेळेस आपण ख-या अर्थाने त्यांच्याशी एकरुप होऊन, बाबा म्हणतात त्याप्रमाणे, जाणीवेच्या पलीकडे जाऊन त्या सताशी तादाम्य होऊ शकू. अशी स्थिती झाली असता, काय उरते? तर फक्त पंचमहाभूतांचा देह. *अशा व्यक्तीला ना कशाची जाण असते, ना कशाचे भान असते.* ही एक समाधी स्थिती असते. त्या आनंद ब्रह्मांत ती ज्योत लय झालेली असते.

ऋग्वेदात स्पष्ट म्हटले आहे की *सताचा कोणी अंत लाऊ शकत नाही.* मग तिथे शास्त्रांचा काय पाड लागणारआहे?

बाबा आपणांस समजावून सांगताना म्हणतात, "शास्त्रे वेडावली म्हणजे शास्त्रांना पुढे जाता आले नाही. त्यांना संताचा अंत घेता आला नाही."

श्री सद्गुरू माऊली पुढे *गुह्य उघड करतांना* म्हणते, *अखंड नामाच्या (सतपदाच्या आसनावरून साक्षात सताने दिलेले नाम - फक्त तेच गुरू गुह्य आहे, इतर सताच्या ठिकाणी काहीही गुह्य नव्हते आणि नाही) गतीत गुंग होऊन गेल्यानंतर, जो बाहेर पडणारा प्रणव आहे, बोल आहे तो म्हणजे ॐकार ध्वनी होय.* 

अशाप्रकारे नामस्मरण करत करत जेव्हा भक्त किंवा सेवेकरी जाणीवेच्या, नेणीवेच्या पलीकडे जातो, त्यावेळेस बाबा म्हणतात, नामाची स्थिती बंद होत जाते. त्या भक्ताची स्थिती कशी होते? तर जाणीव रहित स्थिती होते. जाणीव अजिबात रहात नाही. आणि मग अशावेळेस स्वयंम् गुरुतत्व प्रगट होते, अर्थात जो भक्त ज्या सद्गुरूंचे ध्यान करणार तेच सद्गुरु त्याच स्वरुपात प्रगट होतात. अर्थात त्या भक्ताला आपल्या सद्गुरूंचे दर्शन होते. ह्या स्थितीला भक्तीमध्ये मुक्ती आणि मोक्ष म्हटलेले आहे. मुक्ती आणि मोक्ष इतर दुसरा तिसरा नसून, हाच मुक्ती आणि मोक्ष होय.
प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(1) क्रमश: