बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग पहिला) परम पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने...

पाचवा प्रणववेद कशामुळे मिळतो? कशामुळे प्राप्त होतो? ज्ञानमार्गामुळे मिळतो. स्वयं प्रकाशाच्या गतीने जाने हाच ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद्गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरुंशी बोलणे, चालणे होवू लागले म्हणजेच पाचवा प्रणववेद प्रगट झाला.
जरी पाचवा प्रणववेद प्रगट झाला, तरी त्यातही आपल्याला भर घालवायची आहे. प्रणव येणे बोल. जसे आपण बोलणे ऐकतो, त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ॐ कार् स्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणववेद प्रगट झाला असे म्हणता येईल. मग अशी ज्योत सद्गुरू सान्निध्याने कुठेही जावू शकते. सद्गुरु सान्निध्याशिवाय हे होणे शक्य नाही. पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याशिवाय आपल्याला गुरुगुह्य काय आहे हे समजणार नाही. जोपर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणववेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपले सद्गुरु काय आहेत याची तो जाणीव घेऊ शकणार नाही. आपले सद्गुरु ओळखू शकणार नाही.
पाचवा प्रणववेद सुरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो. आम्ही हे म्हणतो हे खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते की नाही? सद्गुरूंना संदेश द्यावयाचे असतील तर ते कोणत्याही तत्वाला ते देऊ शकतात. हाच तो पाचवा प्रणववेद.
आपण पाहतो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सुक्ष्माने कुठेही सद्गुरूंच्या आदेशानुसार जावून येते की नाही?
पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याखेरीज ही जी देवाण-घेवाणीची त-हा आहे, अर्थात संदेशाच्या आदान-प्रदानतेची त-हा साध्य होणार नाही, साध्य होऊ शकणार नाही. पण पाचवा प्रणववेद सिद्ध होण्यासाठी सापडण्यासाठी भक्ताने वा सेवेक-याने काय केले पाहिजे? तर नामस्मरण केले पाहिजे.
मनाने झटले पाहिजे. सेवेकरी नामस्मरण करतोच आहे, आम्ही नाही असे म्हणत नाही. पण नामस्मरण कसे केले पाहिजे?
नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रह्मानंदाप्रत घेवून गेला पाहिजे. त्या अनंताच्या कानापर्यंत त्या नामास्मरणाचा नाद पोहचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ॐ कारापर्यंत पोचली पाहिजे. लक्षात घ्या, ध्यानधारणेकरीता आसन आहे अर्थात ध्यानधारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण कोठेही करता येते. ते करतांना इकडे-तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार, म्हणून नामस्मरण करताना नाम अशा त-हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच कामा नयेत. नेत्रासमोर केवळ सद्गुरुंचीच छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील. पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन् ते ध्यान ! दोघांची संयुक्तता साधली अन् त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहचतो. अशात-हेने या चाकोरीतून एकदा कां सेवेकरी ऊर्ध्वतेने वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणववेद प्रगट होणारच. पण पाचवा प्रणववेद प्रगट होण्यासाठी सद्गुरु दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरु दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरु दर्शनानंतर सूक्ष्म गति ही पुढची पायरी.
पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर त्याठिकाणी स्थिर होऊन गतिगतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भेदभाव नाही, कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता, महान ऋषी-मुनी होऊन गेले. पण प्रत्येकजण आपापल्या पायरीप्रमाणे राहत होते.
संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून, जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे.
आजचे युग हे कलियुग आहे, येणेच संशययुग आहे. मन चलबिचल होते द्विधा होते. लक्षात घ्या तापते ते आपले मन, आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही घेणे देणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत्. येणेच सद्गुरु !
आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी ! लक्षात ठेवा, शांत राहिल्यानंतर तुम्ही कधीही अनन्तांपासून दूर जाणार नाही.    
पाचवा प्रणववेद मिळवायचा असेल तर माझ्या ठिकाणी ये आणि सताच्या ठिकाणी रममाण हो. अठराव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, तुला अजूनपर्यंत सर्व योगांची माहिती सांगितली. फक्त तू दोन गोष्टी लक्षात ठेव. तू तुझे मन माझ्याचरणी पूर्णत्वाने लय कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही आठवू नकोस. नामस्मरण करत करत माझ्यातच लय हो. म्हणजे मी तुला माझ्यातच सामावून घेईन. अन् एकदा का मी तुला माझ्यातच सामावून घेतले मग वेगळे काय राहिले? पार्थ कृष्ण बनल्यानंतर शिल्लक काय राहिले. एकदा सामावून घेतल्यानंतर सर्वस्व प्रगट झाले. सेवेकरी या गतीने जात जात जर सद्गुरुमय बनला, मग वेगळे ते शिल्लक काय राहिले. हे होण्यासाठी सर्वात प्रथम मन शुध्द-शुचिर्भूत कर. लक्षात ठेवा, सद्गुरु मनाची पाहणी प्रथम करतात. सेवेकरी मनाने सद्गुरुंशी किती तन्मय आहे ही पाहणी प्रथम असते. तुमच्या तनाची वा धनाची पाहणी ते करीत नाहीत. मन जर सद्गुरूंच्या ठायी पूर्णत्व अर्पण केलेले असेल तर तन आणि धन हे अर्पणच असते. मनच जर सद्गुरुमय झाले मग वेगळे ते काय राहिले? सेवेक-याने जर पूर्णत्वाने मन माझ्याठिकाणी अर्पण केलेले आहे, मग सद्गुरु म्हणतात, त्याला मी माझ्या वेगळा का ठेवू? जें मन सतावेगळे दुसरे काही पाहत नाही, मग ते सतापासून दूर राहू शकेल का? तर ते शक्य नाही. अशा ज्योतीला आज नां उद्या जवळ करतीलच. त्याला पाचव्या प्रणववेदाचा गाभा पाहता येईल. अशा त्या भक्ताला ते सत् सर्वस्व दाखवतील. सत्-चरण मिळवायचे असतील, तर सत्-चरणांवर सर्वात प्रथम काय अर्पण केले पाहिजे, तर आपले मन ! पण ते मन पूर्णत्वाने अर्पण होत नाही. हीच या कलीयुगातली मेख आहे. अनंतांनी आपल्या संदेशात सांगितले आहे, सत्युगात जसा कस होता तसा कस आता घ्यायचा नाही. पण या कलीयुगात मनाचा कस मात्र त्यांनी ठेवलेला आहे. पण सेवेकरी मनाच्या कसात उतरत नाहीत. फक्त म्हणतात, सतावेगळा मी नाही, माझ्यावेगळे सत् नाही. लक्षात घ्या, सेवेक-यांनो हे मन ज्यावेळेस प्रगट होईल, त्यावेळेस पाचवा प्रणववेद प्रगट होईल. पण मनच प्रगट होत नाही, तर पाचवा प्रणववेद प्रगट कसा होईल? भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे, मन ते मजपासोनी जाण ! मन माझ्यावेगळे आहे कां? त्याची निर्मिती माझ्यापासूनच आहे.
पाचवा प्रणववेद प्रगट झाल्यानंतर मन आणि मी दोघांचाच व्यवहार चालू असतो. म्हणजे मनही तेच आणि मी ही तेच. त्याठिकाणी वेगळेपण उरत नाही. म्हणून तेच मन त्या सतातच लय करा.                                     
क्रमश: पुढे चालू.........२..........

1 टिप्पणी:

mraju म्हणाले...

aapan patvilela lekh pachava ved atishay aavadala vachun aanand zala