रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग दुसरा)


पार्था तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे, आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन आम्हाप्रत लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो की तुमचे मन सत्मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणववेद पाहता येणार नाही. समजा, पाचवा प्रणववेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरु दर्शन तरी मिळावा. शुभ्रप्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होऊ शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला ते कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का ? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करीत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का ? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थुल गेले. तुमच्या स्थूलात वास करणारे तत्व तुमच्याबरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सताचे सत्-चरण तुम्ही पाहणार आहात ते तत्व मनाला जाणीव देऊन मनाला हलवते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जाण असते. या पंचमहाभूतांच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताना सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जें स्थुल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत? तू आणि सत् एकच आहेत, कवचात तुही आहेस अन् कवचात सत् देखील आहे. आज आपण पाहतो, मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंचमहाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देऊन कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुणांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलात कसे प्रवेश करतात, हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे कां ? मनाने बाजारगप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते.सेवेकरणीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्चर्या केली?
आपल्या आसनाजवळ लाघव आहे. लाघव झाल्यावर, त्रास होऊ लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, लाघव करण्यासाठी चैतन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा. लक्षात घ्या, चैत्यानाला त्यांनीच निर्माण केले. आम्हालाही त्यांनीच निर्माण केले. अधिकारदेखील त्यांनीच बहाल केलेत. अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच. जन्माला त्यांनीच पाठविले. तुमचे पालन-पोषणही तेच करीत आहेत. दाही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असूनदेखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतींना आपली चूक काय झाली हे कळू नये, तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे?
उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्याकडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे? आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? तर नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड, येणे शुद्ध-शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरु कधीही शांत बसणार नाहीत, पण ते बनवाबनवीचे अश्रु असतील तर लक्षही देणार नाहीत.
आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मुनिंबरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते, मग या अशा आसनाच्या सेवेक-याची पातळी कशी हवी? तर अत्यंत उच्च-गतीची हवी.
जरी आपण या कलीयुगात असलो तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत. मग आपल्या विचारांची गति, विशालता, उच्च हवी की नको? ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. अन् ही जाण घेवून त्याप्रमाणे कृतीमान असणे देखील आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथें या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे? त्यांनीच पुढे संदेश दिलेत, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ! तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो. अशा मानवाची जर तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे, अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ठ नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठवील का? आमचे संदेशच असे आहेत, सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुम्हाला मला डोळेभरून पाहता येईल. पवित्र आचरण नसेल तर तू कसा बरे मला पाहू शकशील? मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा कां मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले, मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, यदात्मा दृढनिश्च्ययी मे भक्ता समप्रिय: !! असा दृढनिश्च्ययी भक्त असेल त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणववेदही लगेच प्रगट होतो.
हे जें स्थान आहे ते सत्पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत, तेथें ऋद्धी-सिद्धी नाही, तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तिचा मार्ग नामस्मरण, ध्यान-धारणा अन् मन सतचरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ति केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ति, त्याच्या ठिकाणी अनंतांचा वास. त्या ठिकाणी अष्ठसिद्धी देखील वास करू शकतात. ज्याठिकाणी ॐकारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथें काय शिल्लक आहे? ज्या ॐकारांचे ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ति हात जोडून उभ्या असतात, असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेकर्याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा! पण आपण एवढेच म्हणायचे, अनंता मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो. आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थुल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते. अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथें जवळच असते, पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जर पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणववेद पाहिजे. जें भक्त आहेत ते सत सान्निध्यात आहेत. सुक्ष त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत. पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामिनी म्हटले आहे, वाजे पाउल अपुले, म्हणे मागे कोण आले? जेथे शंकराचे स्थान तेथें पिशाच्च त-हा असणार, पण जिथे श्रीहरीचे स्थान तिथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो सताचा भक्तच आहे. 
क्रमश: पुढे चालू ........3

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: