शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

ॐ कार....!!!

ॐ कार....!!!
तेज म्हणजे प्रकाश. सूर्य उगवल्यानंतर तेज आहे. पण पृथ्वी आड गेली कि तो मावळतो. हि जी सर्व पंच महाभूते आहेत, त्यांना आकार आहे असे सांगता येत नाही. मग हि पंच महाभूते निर्माण करणारे जे परम निधान तत्व आहे, ज्यांना आपण अनंत तत्व, सर्वज्ञ म्हणतो, त्यांनी धूनधूनकारातून ॐ कार फेकले, त्यांनीच हि पंच महाभूते निर्माण केली आहेत. त्यात त्यांनी त्रिगुण टाकले, अकार, उकार, मकार टाकले अन तदनंतर आपण त्यात अदृश्य रुपी राहिले. तेच हे ॐ कार तत्व.
ॐ कारानीच सर्व माया पसरवली, माया पसारा निर्माण केला. चौर्याएैंशी  लक्ष योनी निर्माण केल्या. त्याचे अधिपती कोण तर अर्थाथ ॐ कार. तेच सर्वस्व त्रिगुणाची घडण घडवीत असतात..... उत्पती तेच, स्थिती तेच, आणि लय सुधा तेच करीत असतात. पण असे कळू देतात का? मीच सर्वस्व करीत असून सुद्धा स्वत: अकर्ते असतात. हि सर्व ठेव कशात आहे? तर तुमच्या देहात आहे. पंच महाभूते सुद्धा तुमच्या देहात आहेत. जे सर्व बाहेर विखुरलेले आहे ते सुद्धा तुमच्या
देहात आहे. प्रत्येक घटक हा सुद्धा ॐ कारमय आहे. त्यांनाच सत किंवा सदगुरु असे म्हणतात. तेच संकल्पविकल्पच्या पलीकडे म्हणजे निर्विकल्प आहेत. (संकल्प विकल्प प्रवचन - भगवान महाराज.)

गुरुवार, २२ मार्च, २०१२

सेवेकर्याची कर्तव्ये.........!!! गुरुदेव पितामह यांची प्रवचने......!!!


आपण सताचे सेवेकरी आहोत, आणि सताचा सेवेकरी सत सानिध्यात श्रद्धायुक्त स्थीतिने राहिला तर त्याला अघोर सूक्ष्म त्रास देऊ शकणार नाही. आपण सताशी तादाम्य स्थितीने राहिले पाहिजे. त्रास झाल्यानंतर स्थानात येऊन प्रणव द्यावयाचे पण स्थानात येऊन सताची भक्ती कोणी करायची? सताने मानवाला पूर्णत्व शांततामय स्थिती करावी अशी प्रत्येक मानवाची मनीषा असते पण सताची सुद्धा मानवाकडून मनीषा असतेच ना? कोणती मनीषा, तुमच्या धनाची नसते, संपत्तीची नसते, शारीरिक स्थितीची नसते तर फक्त तुमच्या श्रद्धेची. प्रथम मानव काय म्हणतो? माझी कौटुबिक स्थीती आहे , मला कर्तव्य करावयाचे आहे, पण त्रास होऊ लागला कि मग दरबारात येतो. दरबार येणे सताची कौंटुबिक स्थिती.
आपण सर्वस्व एकाच स्थितीत येता म्हणजेच सताची कौंटुबिक स्थिती होय. सत स्थुलात असताना कोणते प्रणव द्यावयाचे? अरे! हे माझे गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजेच कौटुबिक स्थिती. हि कलियुगी स्थिती आहे आणि या कलियुगात मानवाला अनेक कर्तव्य आहेत पण प्रथम कर्तव्य कोणते? तर सत नामस्मरण. सत नामस्मरण हे मानवाचे  आद्य कर्तव्य आहे. मायावी स्थितीत तुमच्या धनाची, मनाची, शरीराची झीज होईल पण सत नामस्मरणाने तुमच्या धनाची, मनाची, शरीराची कोणती स्थिती होईल? तर तेजोमय स्थिती होईल आणि सत तुमच्यात पूर्णत्व सहवास करून राहील. मग अघोर सूक्ष्म तुमच्या सहवासात राहील का?
मानवाला माया आहे तशी सतालाही माया आहे. तुम्ही सर्वस्व हि सताचीच माया आहे. तुमची पूर्णत्व स्थिती करून देणे हे सताचे आद्य कर्तव्य आहे, तसेच सताचे नामस्मरण करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. हे जर मानवाने केले तर तो सतापासून दूर राहील का? नाही राहणार. तो सताप्रत येणारच. मानवाला शरीर देह मिळाल्या नंतर सुख हि आहे आणि दु:खही आहे. दोन्ही स्थितीत जर मानव एकाग्र झाला तर त्याला सताचे दर्शन दूर आहे का? ( गुरुदेव पितामह )

मंगळवार, २० मार्च, २०१२

अहम ब्रम्हास्मि........!!!


अहम ब्रम्हास्मि ----
मी तुझ्यातच आहे, प्रकाशाची जाणीव मिळाली नाही तर
ब्रम्हरूप कसे पाहता येईल?  प्रकाश मिळाला नाहीतर ब्रम्हरूप पाहता येणार नाही.
आत्म्याचे रूप पाहणे म्हणजेच ब्रम्हरूप पाहणे. तो निर्गुण स्वरूपी आहे कि सगुण
स्वरूपी आहे हे सुद्धा समजत नाही. पूर्ण प्रकाशात स्थिर होऊन ज्यावेळेला तो रममाण होतो त्या वेळेला प्रथम पायरी म्हणजेच स्वस्वरूपी जाणीव. तुझेच स्वरूप तुझ्या समोर आणतात ... त्यालाच स्वस्वरूपी जाणीव म्हणतात. त्याला ब्रम्हरूप हे पहिले पद आहे. सगुण रूप, प्रथम तुमचेच तुम्हाला दाखवतात. हे पाहिल्यानंतर मग तुम्हाला कळते अहम् ब्रम्हास्मि. हे पाहिल्यानंतर भक्त म्हणतो मीच ब्रम्ह आहे. माझ्या वेगळे ब्रम्ह नाही. हे कोणाच्या कृपेने होते? तर सद्गुरू कृपेने होते.  (परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांच्या प्रवचनातून.....)

शुक्रवार, २ मार्च, २०१२

अजपा-जप ......भाग तिसरा.....!!!

सो ऽ हम् :
हा जो अनायासाने सहजासहजी जप होत असतो यांत कोणता मंत्र जपला जातो हे आपण पाहू. एकांतामध्ये स्वस्थ चित्ताने बसावे व श्वासोच्छवासावर लक्ष ठेवावे म्हणजे श्वासोच्छवासाचे वेळी सो ऽ हम् सो ऽ हम् असे शब्द उमटतात असे प्रत्यक्ष अनुभवास येईल. श्वास आत घेताना ‘सो’ व बाहेर सोडताना ‘हं’ अशा त-हेने सोहंचा हा अखंड जप सुरु असल्याचे ध्यानी येईल.
श्री समर्थ म्हणतात –
एकांती मौन धरून बैसे / सावध पाहाता कैसे भासे / सोहं सोहं ऐसे / शब्द होती //
ऐसी हे अ-जपा सकळासी / परंतु कळे जाणत्यासी / सहज सांडून सायासी / पडोच नये //
आपण जागृत अवस्थेत अगर स्वप्नावस्थेत असलो किंवा गाढ निद्रेतही असलो तरी हा जप आपल्यास नकळत पाण्याचे प्रवाहाप्रमाणे एकसारखा सोहं, सोहं, सोहं असा सुरुच आहे ! या अखंड जपात सोऽहम् असा जप होत असतो. या मंत्राचे अक्षराकडे पाहिले म्हणजे कळून येईल कि, स: व अहं अशी दोन पदे यामध्ये आहेत. यांचा अर्थ असा कि तो मी (आहे), वेदांत शास्त्राचे दृष्टीने याचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थ निरनिराळा आहे.
वाच्यार्थ असा कि, अज्ञानाच्या उपाधीमध्ये – अविद्येमध्ये – गुरफटलेले आहे असे भासणारे चैतन्य, म्हणजे अर्थात अहं विशिष्ट बिंदुमात्र जीव, हा मायोपाधिक सर्व जगावर सत्ता चालविणारा ईश्वर आहे. हा अर्थ घेतला म्हणजे या मंत्रात जीवा शिवाचे ऐक्य दर्शविले आहे असे दिसून येईल!  
लक्षार्थाने विचार केला तर असे कळून येईल कि, आपले स्वस्वरूप जो अंगुष्टमात्र आत्मा, तो अखिलव्यापी प्रकाशरूप परमात्मा आहे. या दृष्टीने आत्म्याचे व परमात्म्याचे यांत ऐक्य दर्शविले आहे असे ध्यानी येईल ! या जपाचे सकार हे शक्तीबीज आहे व हकार हे पुरुष बीज मानिले आहे असे समजावे. सकार बीज नामरुपात्मक दृश्य जडाचा उद्भव व लय कळून येतो ! या जपासम्बधी कित्येकांनी असे सांगितले आहे कि, श्वास आत घेताना स: म्हणजे तो ईश्वर मी आहे अशी वृत्ती स्वासाबरोबर आत घ्यावी व श्वास बाहेर सोडताना अहं म्हणजे मी ही अहंकार वृत्ती बाहेर सोडावी. अशा त-हेने देहाच्या अहंकाराचा त्याग करीत जावे व ईश्वर वृत्ती सतत आत साठवीत जावी म्हणजे कालांतराने आपणच सर्वव्यापी ईश्वर आहोत असा साक्षात्कार होईल ! याचा अनुभव अभ्यासाशिवाय मिळणार नाही. हे सहज शब्द आहेत. ही सहज उपासना आहे.
समर्थ म्हणतात –
उच्चारेवीण जे शब्द / ते जाणावे सहज शब्द /
प्रत्यया येती परंतु नाद / काहींच नाही //
ते शब्द सांडूनी बैसला / तो मौनी म्हणावा भला //
हा जप सर्व प्राणीमात्र करतात. परंतु तो फक्त जाणत्यासच कळतो व त्याचे रहस्य त्यास कळते. या सहज जपाचे रहस्य कळून घेतल्यानंतर इतर कोणत्याही मंत्रजपाचे सायासात पडण्याचे कारण नाही. इतर जप हे मुद्दाम उच्चार करून करावे लागतात त्यामुळे नाशिवंत आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.
उदाहरणार्थ दगड उत्तम घडविला व मोठ्या सायासाने त्याचा जरी देव बनविला तरी तो केव्हाना केव्हा भंग पावणारच. देव मात्र सर्वव्यापी व सहज आहे. अशा स्थितीत सहज असणा-या देवावर विश्वास ठेवण्याऐवजी नाशिवंत दगडावर कोण विश्वास ठेवील? त्याचप्रमाणे या सहज अ-जपा-जपावर भावना ठेवली म्हणजे सहज देवाची उपासना आपोआपच होते, सहज जप होतो, ध्यान घडते, स्तुति होते व ईशस्तवन होते. अशा त-हेने जी सहज सेवा होते तीच सर्वव्यापी ईश्वरास प्रिय होते. म्हणून याच जपाचे रहस्य समजून घेणे व त्याचा अनुभव घेणे हे श्रेष्ठ कर्तव्य होय ! आपल्या देहरूपी घरांत सुरु असणा-या या ज्ञानभांडाराचे जर आपण ज्ञान करून घेतले नाही तर निद्रेवी पुरुषाप्रमाणे स्थिति होते. निद्रेव्यास द्रव्याचा साठा तळघरांत असला तरी सापडत नाही म्हणून तो दरिद्री राहतो. खाली लक्ष्मी राहते व वर हा दरिद्री वावरतो अशी स्थिति होते ! तळघरांत द्रव्याचा साठा, भिंत्तीत द्रव्याचा साठा, खांबात व तुळवटांतही द्रव्याचा साठा ! अशाप्रकारे सभोवार द्रव्य असून आपण मध्ये कोरडा तो कोरडाच राहतो ! अशा परिस्थितीत जो करांत असतो त्यास अधिक दारिद्र्य येते. ईश्वराची ही काय अगाध करणी ? कित्येक द्रव्य पाहतात तर कित्येक त्याचा उपयोग करतात. हीच प्रवृत्ति व निवृत्ति होय ! म्हणून या सर्व गोष्ठी लक्षात घेवून अंतरीच्या नारायणाची ओळख करून घ्यावी.
     या मंत्र जपास मालेचे कारण नाही व मोजदादिचेही कारण नाही. ईश्वरानेच प्रत्येक दिवशी २१६०० इतका हा जप होतो असे अगोदरच ठरवून टाकले आहे. आपण जर काय करावयाचे असेल तर ते एवढेच की, या जापाकडे अनुसंधान वृत्ति ठेवावयाची. सकाम कर्म चित्तशुद्धीस कारण असते. चित्तशुद्धीकरता म्हणून का होईना या सहजासहजी होणा-या मंत्रजपाचे फळ, प्रत्येक स्त्री-पुरुषाने आम्ही वर उध्दृत्त केलेल्या शास्त्रोक्त जपविधीचे, दररोज प्रात:काळी सूर्योदयाबरोबर उदक सोडून पदरात का पडून घेऊ नये?
सौजन्य: षटचक्र दर्शन .......लेखक: श्री म वैद्य 

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?


सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?
      वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !! .......गुरुगीता
सद्गुरू म्हणजे देहधारी जडमूर्ती या भावनेने व अर्थाने त्याजकडे पहावयाचे नाही. तर याहीपलीकडे जावून सुक्ष विचारांती, सद्गुरू म्हणजे बुद्धीच्या अतीत असलेला आत्मा होय ! दुसरे काही नाही. हेच सत्य आहे. म्हणून त्याची प्राप्ती होण्याकरिता बुद्धीवानाने प्रयत्न केला पाहिजे. मूळमाया – जिस अविद्या असे म्हणतात – तिच्यायोगे देहाचे व जगाचे भान होते. आत्मसाक्षात्काराने तिचा निरास होतो व सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. इतक्या उच्च अर्थाने विचार केल्यास नित्य, पूर्ण, निराकार व निर्गुण असे परब्रह्मस्वरूप हेच सद्गुरूंचे स्वरूप होय.
सध्या जनतेमध्ये शारीरिक व मानसिक दौर्बल्याबरोबर आत्मिक बलाचाही –हास होत आहे, असे दृष्टोत्पत्तीस येते. यावर उपाय काय?
समाजात एकी उत्पन्न होऊन त्याची सामाजिक, आर्थिक व अन्य त-हेने उन्नतावस्था होणे अत्यंत जरूर आहे; पण त्याचबरोबर पूर्वकालीन द्विजांमध्ये व हल्लीही काही विभूतींमध्ये वसत असलेले सद्गुण म्हणजे शांत वृत्ति, तेजस्विता, त्यागवृत्ति व समाधान; तसेच कर्तुंमकर्तम् शक्ति आदिकरून गुणांचा प्रकाश कसा होईल इकडेही लक्ष दिले पाहिजे.
समाज हल्ली त्रिविध तापाने पोळला आहे व त्याची अंतर्मुख दृष्टी होऊ लागली आहे तेव्हा उपरिनिर्दिष्ट गुणांचा अभाव होऊन ही अधोगती का झाली याचा खोलवर विचार करणे जरूर आहे. इतिहासाकडे पहिले तर असे दिसून येईल की, द्विजानी परिस्थितीप्रमाणे आपद्धर्म म्हणून पुष्कळ वृत्ति स्वीकारल्या व वैशिष्ट्य कायम ठेवून हिंदुधर्म राखण्याचा प्रयत्न केला; परंतु आपद्धर्माची मर्यादा सध्या येथपर्यंत गेली आहे की, द्विजांनी – विशेषत: ब्राह्मणांनी – जवळजवळ आपले सर्व आचार व कर्मे सोडली, असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच आध्यात्मिक शक्ति वाढविण्याचे त्यांना नेमून दिलेले जें ज्ञान व उपसानादि मार्ग, तेही त्यांनी अजिबात सोडले. सध्याच्या परिस्थितीत आचार यथासांग होत नाहीत, अशी तक्रार ऐकू येते.  परिस्थितीनुरूप करणारास ते कठीण आहेत असेही नाही; किंवा सर्वतोपरी शक्य नाहीत असेही नाहीत, तरी मानसिक उन्नती करून घेणे व तद्द्वारा आध्यात्मिक तेजस्विता वाढविणे ही गोष्ट सर्वांस साध्य आहे आणि तशी ती सध्याच्या काळी वाढविणे अत्यंत जरूर आहे.
हल्ली बुद्धीप्रामाण्यास फार महत्व देण्यात येते. सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे प्रत्येकाने वागावे, असे सांगितले जाते. पण ही सद्सद्विवेकबुद्धी कोणती? याची मात्र कल्पना बहुतेकांस नसते.
हल्ली, सद्सद्विवेकबुद्धीचा अर्थ – मनास रुचेल व वाटेल ते असा घेतला जातो. परंतु हे चुकीचे आहे. याचा खरा अर्थ असा की, सत् म्हणजे परब्रह्म वस्तू व असत् म्हणजे मायिक सर्व क्षर सृष्टी या दोघांचा विवेक म्हणजे सत् कोणते व असत् कोणते त्याचा विचार करून सद्वस्तुचे ग्रहण करून असद्वस्तूचा त्याग करणे होय. अशी जी बुद्धी ति सद्सद्विवेकबुद्धी होय.
सद्सद्विवेकबुद्धीने खरोखरीच सर्वानी वागावयास हवे. अशा बुद्धीच्या विचाराने वागले म्हणजे अविद्येचा नाश होऊन आत्मत्वाचे ज्ञान होते व त्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. विद्येच्या योगाने प्राप्त झालेल्या या सामर्थ्यामुळे अमृतत्व मिळते, असे केनोपनिषदात सांगितलेले आहे; म्हणून द्विजांनी आपल्या वेदांनी जी उपासना सांगितली आहे, तीच करावयास हवी व त्यातच त्यांचे आत्यंतिक कल्याण आहे.
ब्राह्मण – ब्रह्म जाणे इति ब्राह्मण:, ज्याला ब्रह्माचे ज्ञान झालेले आहे असा तो मग कोणीही असो, तोच खरा ब्राह्मण होय. प्रणवोपासना या ग्रंथात लेखकाने दिलेल्या टीपेनुसार ‘ब्राह्मण’ हा शब्द ब्रह्म जाणण्याची इच्छा करणार या अर्थी व ज्याला गायत्रीची उपासना करण्याचा अधिकार आहे असा या अर्थी वापरण्यात आला आहे असे म्हटले आहे. (पृष्ठ : २१)   
ज्ञानवान जें ब्राह्मण होते त्यांनी आपली उपासना दृढ करून व सतत अभ्यासाने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. प्रणवरूप जी गायत्री तिचेच अखंड ध्यान करून तिचे ज्ञान प्राप्त करून घेतले. व्यक्त ओंकार व अव्यक्त ओंकार यांचा साक्षात्कार ते मात्रालयाभ्यासाने करून घेत व अखंड ब्रह्मानंदात निमग्न होत ! अशी ही सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, अर्धमात्रात्मक प्रणवसंवितीची उपासना सोडून भलत्याच मार्गाने जाणे म्हणजे अधोगति प्राप्त करून घेणे होय. ब्रह्मा, विष्णु व महेश ज्या आदितत्वाची उपासना करतात अशी सर्वश्रेष्ठ उपासना सोडणे म्हणजे मूळ सोडून शेंडा धरण्यासारखेच होय. 
प्रणवोपासना ही सर्व सांप्रदायिक उपासनांची जननी आहे. या उपासनेचे प्रयोजन म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधून निरंजनस्वरूपी लीन होणे, हे होय. अविद्यादि बीजांचा समूळ नाश होऊन ब्रह्मसाक्षात्कार होणे व निरतिशयानंद सुखप्राप्ति होणे, हे याचे फल आहे आणि दृढ अभ्यास हे साधन आहे व ब्रह्मसाक्षात्कार हे साध्य आहे.
ज्ञानमार्गात ‘गुप्त’ असे काही नाही. थोर सत्पुरुषांनी व साधुसंतांनी आपले अनुभव ग्रंथरुपाने स्पष्टपाने जगापुढे ठेवले आहेत. ज्ञान स्वयंप्रकाशरूप आहे.  
सौजन्य: प्रणवोपासना .............श्री म वैद्य